जिवती तालुक्यातील बेरोजगारी रोखण्यासाठी उद्योग निर्मिती करण्याची मागणी
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती : चंद्रपूर जिल्हयातील तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असून एकही मोठे उद्योग नसल्याने तालुक्यातील नागरिकांना रोजगाराच्या शोधात वर्षानूवर्ष भटकंती करावी लागत असून तालुक्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठे उद्योग निर्मिती करण्याची मागणी जिवती तालुका प्रमुख भरत बिरादार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदनातून केली आहे.
जिवती तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे निघून गेली मात्र अजूनही अनेक गावांत विकासात्मक योजना पोहोचल्या नाहीत.७० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या तालुक्यातील ८४ गावांतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने निसर्गाच्या भरोश्यावर अवलंबून राहावे लागत असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही.खर्च अधिक अन् उत्पन्न कमी अशी स्थिती निर्माण होते,त्यामुळे दिवाळीपूर्वीच येथील नागरिक रोजगाराच्या शोधात मुला बाळांच्या शिक्षणाची पर्वा न करता गाव सोडण्याची वेळ येते हि तालुक्यातील नागरिकांची शोकांतिका आहे.तेलंगणा सीमेवर असलेल्या या तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात असून सुरजागड सारखे प्रकल्प, सिमेंट कारखाने व एम.आय.डी.सी.ची स्थापना केल्यास येथील बेरोजगार युवकांना व शेतकऱ्यांना सोय उपलब्ध होईल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असून तातडीने रोजगाराच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी मोठे उद्योग निर्मिती करण्याची मागणी यावेळी भरत बिरादार यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.