निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथे संपन्न झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या आधी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 143 नेत्रारुग्नांची तपासणी करण्यात आली. या शिबिरा करीता डॉ. गुंजन कांबळे, नेत्ररोग तज्ञ, आद्यवी नेत्रालय, चंद्रपूर उपस्थित होत्या. या शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, विशेष अतिथी डॉ. विजया गेडाम, चंद्रपूर जिल्हा, रा. से. यो. समन्वयक, श्री विलास जीवतोडे, उपसरपंच, चोरा, श्री एम. यु. बरडे, मुख्याध्यापक, स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय, चोरा, तसेच पोलिस पाटील, सागर सांगुरले व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने व प्रियंका मुंडे, उत्कर्षा पारखी, हर्षला शेडमाके हिच्या स्वागत गीताने व रागिनी निखाडे, कोमल जंगपल्ली, प्रियांशू आगलावे व विश्वरूपा कार्लेकर यांच्या एन. एस. एस. गीताने झाली. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गजेंद्र बेदरे यांनी आपल्या प्रस्ताविकेतून या सात दिवसीय शिबिराचे दिनचर्या व शिबिरा दरम्यान घेण्यात आलेले विविध उपक्रम व बौद्धिक कार्यक्रम यांची सखोल माहिती दिली.
याप्रसंगी या शिबिरात उपस्थित महाविद्यालयाचे शुभम असमपल्लीवार व स्नेहल निपुंगे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ सौ विजया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजना, चंद्रपूर जिल्हा समन्वयक यांनी शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतात व स्वावलंबीपणा वाढतो त्यामुळे त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे आपले विचार व्यक्त केले. एम. यु. बरडे, मुख्याध्यापक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रमाचा सल्ला दिला. विलास जिवतोडे, उपसरपंच, चोरा यांनी विद्यार्थ्यांना पुढील भविष्याकरिता शुभेच्छा देत पुढील वर्षी सुद्धा चोरा येथे येण्याचे निमंत्रण दिले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना युवा म्हणजे काय त्यामध्ये अमाप अशी शक्ती असते आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर केला तर जीवनामध्ये तो खूप मोठे स्थान गाठू शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन अनामिका चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा संदीप प्रधान, डॉ. सौ किरण जुमडे, डॉ. अपर्णा धोटे, प्रा. कुलदीप भोंगळे, प्रा. सचिन श्रीरामे, श्री. शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.