बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू
दिव्यांग प्रकल्पग्रस्ताचाही उपोषणात सहभाग
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
गेल्या 62 दिवसांपासून सुरु असलेले बरांज येथील महिला प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन हे गंभीर वळण घेताना दिसत आहे. सदर आंदोलनाचा अद्यापही तोडगा न निघाल्याने महिलांनी जलसमाधीचा इशारा देत 10 महिला खाण परिसरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्या आहेत.
तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने सदर प्रकल्पग्रस्त महिलांनी आता अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात गावातील दिव्यांग प्रकल्पग्रस्त संतोष पुनवटकर हे सुद्धा सहभागी झाले असून आपल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या आंदोलनातील तिढा अद्याप कायम आहे. कंपनी व जिल्हा प्रशासन जोपर्यंत अठरा मागण्यांच्या पूर्ततेचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याच्या निर्धारावर हे महिला प्रकल्पग्रस्त ठाम असून यामुळे प्रशासना समोरील पेच वाढला आहे.
उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन करणार्या दहा महिलांची भेट घेतली व त्यांना खड्ड्याच्या बाहेर निघण्याची सूचना दिली. मात्र महिलांनी खड्ड्यातून बाहेर निघण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात दोन्ही कंपनीशी चर्चा करून चौकशी करू असे उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी सांगितले आहे.