गोंडपिपरी तालुका विकासात अग्रेसर करेल – ॲड. वामनराव चटप
तहसिल कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाची धडक

चंदा ब्लास्ट
शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळावे, अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीतील वर्गीकरण रद्द करावे, जातनिहाय जनगणना करावी, तालुक्यात एमआयडीसी व्हावी, कन्हाळगाव अभयारण्य रद्द करून घरांसाठी जागा द्या आदी मागण्यांसाठी शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात गोंडपिपरीत शेकडो नागरिक मोर्च्यात सामिल झाले. गेल्या १४ वर्षांत गोंडपिपरी तालुक्याची विकासकामे प्रलंबित राहिली आहे. विकासात गोंडपिपरी तालुका अग्रेसर व्हावा म्हणून मला विधानसभेत जाण्याची संधी द्या, असे आवाहन माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले.
गोंडपिपरी येथील शिवाजी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारांच्या संख्येने महिला, युवक, बेरोजगार, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. गोंडपिपरी तालुका विकासात मागे राहिला असून तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले आहेत.
मात्र यावेळी ॲड. वामनराव चटप यांना संधी द्यावी, असे मत जिल्हा समन्वयक शालिकराव माऊलीकर यांनी व्यक्त केले. यावेळी स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, ज्येष्ठ नेते आनंद खर्डीवार, शेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रफुल आस्वले, तालुकाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, कमलाकर खोब्रागडे, मनोज कोपावार, सरपंंच अंकुर मल्लेलवार, सत्तरसिंग डांगी, मालनताई दुर्गे, ओमाजी वाढई, सुरज भस्की आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मोर्चात गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला, युवक यांची उपस्थिती लक्षणिय होती.