वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय – डॉ. अशोक जीवतोडे

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा आढावा घेत प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. भेटी दरम्यान तेथील भारतीय जनता पक्षाचे खासदार व आमदार यांच्यात योग्य समन्वय दिसून आला.
नवीन व जुन्या सर्व पदाधिकारीमधे एकजुटता दिसून आल्याने भारतीय जनता पक्ष हा वर्धा जिल्ह्यात आणखी मजबूत होत असताना दिसून आला. पक्षाच्या अधिकांश पदाधिकाऱ्यांना भेटी घेवून काही अडचणी असल्यास त्या सोडविण्याची खात्री डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली. पक्षाच्या जनप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. पक्षाच्या ओबीसी मोर्चाची जवाबदारी नवीन कार्यकारिणीवर आहे, ही नवीन कार्यकारिणी उत्कृष्ट कार्य करीत आहे. पक्षांतर्गत सहकाराची भावना असल्याने पक्षवाढीस पोषक वातावरण असल्याचे त्यांना दिसून आले, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले आहे.
प्रवास दौऱ्यात वर्धा जिल्ह्यात पुलगाव येथे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष संजयजी गाते, ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मंगेश झाडे यांचेशी देखील पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यात आली. ओबीसी समाज सध्या एका मोठ्या संघर्षमय काळातून जात आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे व ओबीसी संवर्गात होत असलेली घुसखोरी थांबविणे हे दोन मोठे कार्य ओबीसीला करणे आहे. त्यासाठी ओबीसी समाजात समन्वय असला पाहिजे. राज्यातील सरकार ओबीसी साठी नवनवीन शासन अध्यादेश काढत आहेत, यासाठी राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले व राज्य सरकारने बिहारच्या धरतीवर जातनिहाय सर्व्हे करावा, व ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यात येवू नये, असे डॉ. अशोक जीवतोडे चर्चा करताना म्हणाले.
ओबीसी मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष संजयजी गाते, ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष मंगेश झाडे यांचेशी चर्चा करताना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे.