विदर्भ राज्य समिती व स्वराज्याचा अरूणोदय यांचे आयोजन
ॲड.वामनराव चटप यांचे हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
चांदा ब्लास्ट
आपण सेवानिवृत्त झालात म्हणजे आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा ओलांंडला आहे. आता यापुढे आपण समाजात मार्गदर्शकाची भूमिका बजावायची आहे. महाराष्ट्रात राहून विदर्भाची मोठी लूट झाली असून विदर्भ हा अनुशेषाचा प्रदेश ठरला आहे. यामुळे सिंचन, रस्ते व विज अनुशेष निर्माण झाल्याने शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बालमृत्यू, कुपोषण, प्रदुषण, विजेचा कमी पुरवठा व लोडशेडींग यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न समाजाला समजले पाहिजे आणि आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. आपण सर्वानी या कार्यात हातभार लावून विदर्भातील नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.
गोंडपिपरी येथील कुणबी समाज सभागृहात स्वराज्याचा अरूणोदय व विदर्भ राज्य आंदोलन समिती यांचे संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी शहरातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल ” सत्कार सेवा साफल्याचा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी शालीकराम माऊलीकर होते. प्रमुख अतिथी बळीराम निकोडे, राजुराचे माजी नगराध्यक्ष रमेश नळे, आंदोलन समितीचे पुर्व विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष कपील इद्दे, अरूण वासलवार, ॲड.रूपेेश सुर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना शालीकराम माऊलीकर यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध व्यथा मांडून त्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरकारने बंद केलेली पेन्शन योजना पुर्ववत सुरू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अरुण वासलवार यांनी गोंडपिपरी शहराचा विकास होण्यासाठी सर्वानी सजग राहण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बळीराम निकोडे यांनी बहुजनांच्या सर्वांगीण विकासाची भुमिका मांडली. ॲड.रूपेेश सुर, आनंद खर्डीवार व कमलाकर सोनटक्के यांनी आयोजनाची पार्श्वभूमी सांगुन सर्वांचे स्वागत केले. यावेळी भाऊजी भोयर व गौतम खोब्रागडे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सुमारे पन्नास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांंचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ॲड.प्रफुल्ल आस्वले, भाऊजी मांदडे,अशोक येल्लेवार,महादेव चोथले,सुरेश पेंंढारकर,मिलिंद उराडे,पी.जे. बक्षी, मुरलीधर पोहनकर,दिलीप पुुलगमवार,नानाजी ठेंगणे, जानकीराम सातारे,मारुती मेश्राम,लहू नेवारे,पत्रुजी चल्लावार,राजेश्वर बट्टे,गोपाळ खेकारे,अशोक कुळे, सुनील फलके,शंकर पाल,समीर निमगडे,अशोक चिंतावार,समीर रायपुरे यांचेसह मोठ्या संख्येंने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.