रेती घाट सुरु करण्यात यावे – सामाजिक कार्यकर्ते नितीन गोहणे यांची मागणी
तहसीलदार सावली मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन ; लाक्षणिक उपोषणाचा इशारा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यामध्ये सध्या रेतीचा दुष्काळ आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने शबरी आवास योजना, रमाई आवास योजना,मोदी आवास योजना सुरु करून गरिबांना घरकुल दिलेली आहेत.रेती अभावी गरजू – गरीब लाभार्थींना मोठी अडचण निर्माण झालेली आहे.आपली घरे पूर्ण कशी करावीत असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.सध्याच्या काळात रेतीचे भाव दुपट्टीने वाढलेले आहेत.सामान्य माणसांना घर बांधकाम करणे कठीण आहे.त्यासोबतच काही व्यक्ती या खाजगी घर बंधित आहेत.त्यांनाही रेती अभावी अडचण निर्माण होत आहे.
*ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे सुरु आहेत.मात्र सदर विकासकामे रेती अभावी ठप्प पडलेली आहेत.शासनाने दिनांक.१९/०४/२०२३ रोजी परिपत्रक काढून रेतीच्या संबंधात मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहे.मात्र इतरत्र ठिकाणी वाळूचे डेपो लागलेली असताना सावली तालुक्यात दिनांक १९/०४/२०२३ च्या परिपत्रकानुसार डेपो न लागल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.
त्वरित सावली तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव करण्याची कार्यवाही करावी व रेती घाट लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काही दिवसात लाक्षणिक उपोषण करण्यात येईल या संबंधित सामाजिक कार्यकर्ते नितीन गोहणे यांचे तहसीलदार सावली,यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल, महेश कोरडे आदी उपस्थित होते.