जलशुद्धीकरण केंद्राने घेतला बालकाचा बळी – यापूर्वीही दोघांचे गेले प्राण
वेकोली प्रशासनाला जाग केव्हा येणार?
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
वेकीलीच्या दुर्गापूर क्षेत्रात असलेल्या व सद्यस्थितीत बंद पडलेल्या जल शुद्धीकरण केंद्राच्या पाण्यात बुडून 12 वर्षीय प्रेम वाघमारे नामक बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली असुन वेकोली प्रशासनाचा ढिसाळपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रेम आपल्या मित्रांसह जल शुद्धीकरण केंद्राच्या परिसरात खेळण्यास गेला होता. इतर मुले घरी परतली मात्र प्रेम घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. सर्व मित्र जल शुद्धीकरण केंद्राच्या परिसरात गेले असल्याचे कळताच पालक व शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली असता तिथे 12 वर्षीय प्रेम चा मृतदेह आढळून आला.
हे जलशुद्धीकरण केंद्र मागील बऱ्याच वर्षांपासून कार्यान्वित नाही मात्र ह्या ठिकाणी अजुनही पाण्याचा साठा असतो. ह्याच ठिकाणी ह्यापूर्वीही दोघांचा बळी गेला होता तरीही वेलोकी प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेत दिरंगाई सुरूच ठेवल्याने 12 वर्षीय प्रेम चा देखिल बळी गेला. सदर घटना उघडकीस येताच जनभावनेचा उद्रेक झाला व त्यांनी वेकोली प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन सुरू केले.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने दंगा नियंत्रक पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात केला. वेकोली अधिकारी तसेच पीडित कुटुंबीयांची बैठक झाली असुन वाघमारे कुटुंबीयांना 25 लाखांची मदत करण्याचे वेकोलीने मान्य केले व अंत्यसंस्कारासाठी तत्काळ 25 हजारांची मदत देखिल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.