ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी अग्रेसर व्हा – उपेंद्र कुलकर्णी
रा. स्वं. संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव

चांदा ब्लास्ट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात कुटुंब प्रबोधन, समरसता, सामाजिक परिवर्तन हे घटक महत्वाचे मानले जात आहे. या घटकाच्या आधारावर व संघटीत कार्यशक्तीच्या जोरावर देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी अग्रेसर होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम सेवा प्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला. यावेळी कुलकर्णी मार्गदर्शन करीत होते. महाराष्ट्र राज्य सरफा असोसिएशन चंद्रपूरचे उपाध्यक्ष राजेंद्र लोढा, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक तथा ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. रवींद्र भागवत व्यासपीठावर उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थर्ये, आर्थिक संपन्नता या गोष्टी परस्पराशी संबंधीत आहे. या सर्वांचा समतोल ठेवून राष्ट्राची प्रगती करायची आहे. चांद्रयान-३ मोहिमेमुळे भारताप्रती जगात आदर वाढला आहे. भारताकडे आज जग महान राष्ट्र म्हणून बघत आहे. त्यामुळे भारताचे नेमके स्वरूप, स्थिती, विश्वाला काय द्यायचे आहे, या संदर्भात आपली भुमिका काय आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’ मुळे आज देशाचे चित्र बदलत आहे. आज शस्त्र, सामुग्री आपल्याच देशात तयार होत आहे. मात्र, दुसरीकडे भारताची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सामाज विघटीत करण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाज जागृतीची गरज आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.
लोढा म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाजाला जोडण्याची शक्ती, अनुशासन बघून मन प्रफुल्लीत होते. आज संघाने आपल्या कार्यशैलीच्या जोरावर विदेशासमोरही आदर्श ठेवला आहे. हिंदू राष्ट्र निर्माण कार्यात युवकांना प्रेरणा देणारी ही एकमात्र संघटना आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व आभार नगर कार्यवाह विनय आत्राम यांनी केले. तत्पूर्वी, ध्वजारोहणानंतर स्वयंसेवकांनी योगासन, नियुध्द, समता प्रात्यक्षिक सादर केले. सुभाषित व वैयक्तिक गीतही झाले. कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह गणमान्य व्यक्ती आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.