विंजासन उडान पुलाचे काम गावकऱ्यांनी पाडले बंद
जमीन संपादित करण्यात न आल्याने बांधकाम रेंगाळले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील विंजासन येथे उभारण्यात आलेल्या उडान पुलाचे शेवटच्या टप्प्यातील सुरू करण्यात आलेले काम उर्वरित जमीन रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात न आल्याने गावकऱ्यांनी बंद पाडले.
सदर जमिनीचे प्रकरण धर्मदाय आयुक्तां कडे असल्यामुळे सदर जमीन संपादनाचे व पूल पूर्ण होण्याचे काम सध्या रेंगाळले आहे. रेल्वे प्रशासनाने या पुलासाठी आवश्यक असलेली उर्वरित जमीन संपादित न करता या उडान पुलाचे काम मुंबईच्या आर. के. मदनी या कंपनीला दिले. कंपनीतर्फे या उडान पुलाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे.
पुलाच्या शेवटच्या टप्प्यात सदर काम अप्रोच रस्त्यासाठी आवश्यक असणारी जमीन संपादित करण्यात न आल्याने पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात अडकले आहे.अप्रोच रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन ही हनुमान मंदिर ट्रस्टच्या मालकीची आहे. मंदिराची जुनी ट्रस्ट बंद पडली असल्याने काही वर्षानंतर नवीन ट्रस्ट तयार करण्यात आली. मात्र नवीन ट्रस्ट तयार करताना गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा काही गावकऱ्यांचा आरोप आहे.
या विरोधात गावकऱ्यांतर्फे धर्मदाय आयुक्त कार्यालयात तक्रारहि करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित आहे. उडान पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम जवळपास सहा महिने बंद होते त्यामुळे हा उडाणपूल अद्याप वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला नाही. शेवटच्या टप्प्यातील काम करण्यास सदर कंपनीने सुरुवात केली असता काही गावकऱ्यांतर्फे हे काम थांबविण्यात आल्याने या पुलाचे काम पुन्हा रेंगाळले असून येणाऱ्या पावसाळ्यात याचा त्रास गावकऱ्यांना होणार असे दिसून येत आहे.
गावकऱ्यांचे प्रतिनिधी बंडू डोये यांना भद्रावती पोलिसांनी पोलीस स्टेशन येथे बोलाऊन सदर प्रकरणाची माहिती जाणुन घेतली.दरम्यान जोपर्यंत या जमिनीच्या प्रकरणासंबंधी धर्मदाय कार्यालयातील निकाल होत नाही तोपर्यंत पुलाचे काम होऊ देण्यास गावकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने पुलाचे काम आणखी रेंगाळले आहे.
पुलासाठी शेवटच्या टप्यात आवश्यक असलेली जमीन हनुमान मंदिराची असुन ती संपादित करण्यात आलेली नाही.या जमिनिविषयी प्रकरण धर्मदाय आयुक्त कार्यालयात आहे.जोपर्यंत याचा निकाल येत नाही तोपर्यंत पुलाचे कामाला आमचा विरोध राहील.
बंडू डोये.
गावकरी, विंजासन.
पुलाच्या शेवटच्या टप्प्यात अप्रोच रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन रेल्वे प्रशासनातर्फे संपादित करण्यात आली नाही. त्यामुळे या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील काम अडले आहे. यात बांधकाम करणाऱ्या कंपनीची कोणतीही चूक नाही. मात्र यामुळे कंपनीला नाहक नुकसान व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मो.तोसीफ पटेल.
प्रोजेक्ट मैनेजर.
आर.के.मदानी कंपणी.
मुंबई.