गावात होतेय ‘शोभा’, असं बोलणं बरं न्हवं – मुख्यमंत्र्यांच्या काकूंवर कार्यकर्ते नाराज
आधी स्वतःची वागणुक बघावी मग इतरांना बोलावे - शोभाताईंच्या वक्तव्यावर कार्यकर्त्यांची क्षुब्ध प्रतिक्रिया

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चंद्रपूर – मागील काही वर्षापासून अडगळीत पडलेल्या ज्येष्ठ भाजपा नेत्या व माजी मंत्री शोभाताई फडणवीस पुतण्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असुन देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मागील दाराने विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची त्यावेळी चर्चा होती मात्र त्यांचा तो प्रयत्न त्यावेळी असफल झाला होता. आता पुतण्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद प्राप्त केल्याने काकूंच्या अशा नव्याने पल्लवीत झाल्याचे त्यांच्या वागणुकीतून व वक्तव्यांवरून दिसुन येत आहे मात्र त्यांच्या उलटसुलट बोलण्याने भाजपा कार्यकर्ते नाराज झाले असुन गावात होतेय ‘शोभा’, असं बोलणं बरं न्हवं अशी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त होणे सुरू झाले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील स्थापना दिनानिमित्त माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी केलेल्या विधानाने नवा वाद पेटला आहे. “पक्ष संघटना मजबूत करा, आपल्या पक्षाची काँग्रेस झाल्यासारखे वागू नका” असे सांगताना त्यांनी पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्ष टोला मारल्याचा आरोप होत आहे. मात्र, त्यांच्या स्वतःच्या गेल्या पंधरा वर्षांच्या वागणुकीकडे पाहता त्यांनीच काँग्रेससदृश वर्तन केल्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. स्वपक्षीय नेत्यांबद्दल त्यांनी केलेल्या विधानाचा आता लोक चांगलाच समाचार घेत आहेत.
शोभाताई फडणवीस दीर्घ काळापासून सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात कार्यरत आहेत, हे आता गुपित राहिलेले नाही. त्यांना पहिल्यांदा युतीच्या मंत्रीमंडळात जाऊ न देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता त्याचप्रमाणे पुतण्या मुख्यमंत्री असल्याने यावेळीही त्यांना रोखण्याचा दृष्टीने त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याची जोरदार चर्चा पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात आहे.
मुल हा स्वतंत्र मतदारसंघ असताना शोभाताई फडणवीस ह्या क्षेत्राचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत होत्या. मनोहर जोशींच्या मंत्रीमंडळात त्या कॅबिनेट मंत्रीही होत्या मात्र त्यांच्या दिर्घ कार्यकाळात मुल सावली क्षेत्राचा विकास शुन्य होता ह्याची प्रचिती नागरिकांना पदोपदी येत असते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर मुल बल्लारपूर मतदार संघात तर सावली ब्रम्हपुरी मतदार संघात विभागल्या गेले. त्यावेळीही सुधिर मुनगंटीवार ह्यांना बल्लारपूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व मिळू नये ह्यासाठी व उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा विजय होऊ नये ह्यासाठी शोभाताईंनी केलेले प्रयत्न अजुनही कार्यकर्त्यांच्या विस्मृतीत गेले नाही हे विशेष.
आश्चर्याची बाब म्हणजे बल्लारपूर विधानसभेतील मुल येथे वास्तव्यास असलेल्या शोभा फडणविसांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी मतदारसंघात किती प्रचार केला हे त्यांनी दाखवावे? मागील पंधरा वर्षांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी एकही सभा घेतलेली नाही. शिवाय तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ह्यांच्या विजयासाठीही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या म्हणून जबाबदारी व कर्तव्य असूनही त्यांनी कोणत्याच प्रकाराचे सहकार्य केलेले नाही हे सर्वश्रुत असुनही इतर नेत्यांवर शरसंधान करण्याच्या प्रवृत्तीला ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशी शोभा फडणविसांची भूमिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते देत आहेत.
इतकेच नाही, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराविरोधात संतोष रावत काँग्रेसकडून लढले होते. बँकेतील घोटाळ्यावरून रावत यांच्यावर एसआयटी चौकशी लागू नये, यासाठी शोभा फडणवीस यांनी काँग्रेसला मदत केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. पक्षाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या – हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार – निवडणुकीतही त्यांनी कोणताही प्रचार केला नव्हता, हे त्यांच्या निष्ठेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
“शोभा फडणवीस यांची भूमिका म्हणजे ‘पुतना मावशी’सारखी – वरवर प्रेमळ पण आतून विषारी,” असा थेट आरोप आता स्थानिक पातळीवरून केला जात आहे. अशा लोकांनी पक्षाचे ‘काँग्रेसीकरण’ थांबवा, असे सांगणे म्हणजे धूळफेक करण्यासारखे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, पक्षात राहूनच पक्षाची मुळे पोखरणाऱ्या अशा नेत्यांवर कारवाई केली जाणार का? की हे वर्तन डावलून पुन्हा पक्ष संघटनेच्या नावाखाली पक्षनिष्ठांच्या बलिदानावर पाणी फिरवले जाणार? असा सवाल उपस्थित होत आहे.