सावलीमध्ये आदिवासींचा रास्ता रोको ; तहसीलदार मार्फत मोफत मंत्र्यांना निवेदन
धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट न करण्याची केली मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी सावली येथे (दि.1) रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद सावलीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षित पणा मुळे राज्यात आदिवासी समाजाचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या आदिवासी समाज हा भौतिकदृष्ट्या अती मागासलेला आहे. आदिवासी समाजाला आरक्षणाचा फायदा मिळत असला तरी त्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे अनेक आदिवासी बांधवांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. तर महाराष्ट्र शासनाने राबवित असलेल्या अनेक योजनांचा लाभ घेण्यास आदिवासी बांधवाना अडचण निर्माण होत आहे. अनेक बोगस आदिवासींनी नोकऱ्या वर कब्जा केलेला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची वाताहात होत आहे. बोगस आदिवासीच्या पाठीशी सरकार असल्याने बोगस आदिवासी वर कोणतीही कारवाई न करता आता धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करणार आहे. त्यामुळे हा अनुसूचित जमातीवर अन्याय होत असून सरकारच्या या षडयंत्राचा आदिवासी समाजातर्फे निषेध करून सावलीचे जुना बस स्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेतले व सावलीचे तहसीलदार यांचे मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात आदिवासी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. शिंदे सरकार मधील मंत्र्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून पोस्टरला आग लावण्यात आली. झोपेचे सोंग घेतलेल्या आदिवासी समाजाच्या 25 आमदार व चार खासदारांचा यावेळी निषेध करण्यात आला. तर यापुढेही अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला. आंदोलनादरम्यान सावली पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
यावेळी जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम, उपाध्यक्ष लखन मेश्राम, सल्लागार युवराज उइके, सचिव अशोक कन्नाके, महासचिव कृष्णा कन्नाके, उपाध्यक्ष उत्तम गेडाम, कार्याध्यक्ष किरण गावडे, संघटक भास्कर गेडाम, रत्नाकर मेश्राम, पुरुषोत्तम पेंदाम, युवराज पेंदाम, रमेश कन्नाके, प्रमोद मडकाम, रेवताताई मडावी, गीता मडावी, कुमदेवी वलादे, अनिकेत शेडमाके, देविदास कुमरे, देवानंद कुमरे, वासुदेव मडावी, राजू कोडापे, राजू वलके, मनोहर गेडाम, जानकीराम उइके आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.