सावली तालुक्यातील दोनशे हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित
भट्टीजांब लगत पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे ; शेतकऱ्यांचे सिंचन विभागाला निवेदन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील आसोलमेंढा तलावामधुन,तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाने असोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्र. २ अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक भागात ठेकेदार मार्फत पाईपलाईन टाकून, व्हॉल् द्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकली. परंतु भट्टीजांब मायणारखाली येणाऱ्या भागात टाकलेली पाईप लाईन चुकीची झाल्याने, आणि अनेक ठिकाणी पाईपलाईन चे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आणि बरेच काम अपूर्णावस्थेत असल्याने दोन वर्षापासून या परिसरातील २०० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
गोसिखुर्द प्रकल्प अंतर्गत शेती सिंचनासाठी आसोला मेंढा तलावाद्वारे मुख्य कालवा सावली मायनर व कापसी मायनर द्वारा करण्यात येते . सावली मायनर द्वारा असोला मेंढा ते भेजगाव पर्यंत, तर कापसी मायनर द्वारा कापसी उपरी ते निलसनि पेडगाव पर्यंत शेतीकरीता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या स्थितीत या दोन्ही मायनर द्वारा केला जाणारा पाणी पुरवठा हा सब मायनर मधून तर शेतापर्यंत भूमिगत पाईप लाईन द्वारा शेताकरीता वॉल बसवून पाणी देण्यात येत आहे. परंतु भूमिगत पाईप लाईन द्वारा व वॉल द्वारा देण्यात येणारा पाणी पुरवठा भटेजांब मायणारखाली येणाऱ्या कोंडेखल, घोडेवाही, भटेजांब, राजोली फाल चक नं.२, या चार गावांतील शेतीसाठी चुकीच्या पद्धतीने वॉल लावण्यात आल्याने व अनेक ठिकाणी पाईपलाईन द्वारे व्हॉल् च्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी मोठमोठे हौद तयार केले मात्र काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याने आणि दोन वर्षे होत असताना अनेक काम अर्धवट असल्याने शेतीला पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नसल्याने शेतातील धान पिक सिंचना अभावी शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पादन घेता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
सदर समस्या मार्गी लावण्यासाठी येथिल शेतकऱ्यांनी दिनांक ८ जून २०२३ रोजी विजय वडेट्टीवार आमदार तथा माजी मंत्री विद्यमान विरोधी पक्ष नेता यांचेकडे तक्रार केली . शेतकऱ्यांच्या तक्रारीची आमदारानी दखल घेऊन गोसिखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांची व्याहाड ( खुर्द )येथे शेतकर्या समवेत बैठक लावून पाईप लाईनची पद्धती दुरुस्त करणे व वॉल व्यवस्थित बसविणे बाबतीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याला एक वर्ष लोटत आहे. परंतु अजूनही पाईप लाईन नव्याने टाकून मिळालेली नाही किंवा वॉल बसवून मिळालेले नाही. याचा अर्थ असा की, कर्मचार्याचे दुर्लक्ष आणि पाईप लाईन टाकणार्या कंपनीची मनमानी तसेच कार्यकारी अभियंता यांची निष्क्रियता दिसून येते. याबाबत बर्याच शेतकर्यांनी संमधीत विभागास अर्ज देवून पाईप लाईन नव्याने टाकून नव्याने वॉल बसवून देण्यात यावे अशी वारंवार मागणी केलेली आहे.
मात्र शेतकर्यांनी केलेल्या मागणीला सुद्धा या विभागाने केराची टोपली दाखवून मागणी अर्ज फेकून दिला जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . पाईप लाईन टाकल्याने काम हे उन्हाळ्यात केल्या जाते. आता उन्हाळा संपत आला, नव्याने पिक घेण्याचा हंगाम सुरू होत आहे. परंतु अजूनही पाईप लाईन टाकून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरातील २०० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहणार की काय यासाठी शेतकरी वर्ग चिंताग्रस्त असून सिंचाई विभागाचे विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा कार्यकारी अभियंता असोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्रं. २ सावली यांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, जलगंगा पाणीवापर संस्थेचे सचिव किशोर उंदिरवाडे यांनी लेखी निवेदन सादर करून दिला आहे. एवढेच नाही तर पाईप लाईन टाकणार्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.