जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आ. धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये महिलांची काढलेली विवस्त्र धिंड शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी आहे. मात्र, अनेक दिवसाचा कालावधी लोटून अजूनही त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही.”
चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्यात ३५०० अधिक १६ ते २५ वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का?” असा सवाल करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “फेसबुक व्हाट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशा प्रकरणातून महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
“अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा सरस्वती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो त्यामुळे खरच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का असा प्रश्न त्यांनी केला.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लवकरच शक्ति कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
चंद्रपूर येथील कोळसा उद्योगातून एका निष्पाप महिलेची हत्या राजुरा येथे घडली. देखील अशी प्रकरणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.