गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील गोरस भंडारवर FDA ची धडक कारवाई; ₹25.86 लाखांचा दुग्धजन्य साठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दि. 31 मे 2026 रोजी वर्ध्यातील गोसंवर्धन गोरस भंडार, मगनवाडी येथे नागपुर वीभागाच्या टीमने अचानक तपासणी करत मोठी कारवाई केली. नीयमीत तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने सुमारे ₹25,86,168 किंमतीचा तूप, खवा व ताकाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान प्राथमिक स्वरूपात खालील बाबी आढळून आल्याची माहिती FDA कडून देण्यात आली आहे:
• दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये परिसर अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त व अस्वास्थ्यकारक स्थितीत असल्याचे आढळले.
• काही उत्पादनांवर अन्नसुरक्षा कायद्यानुसार आवश्यक असलेले लेबल, उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक व इतर आवश्यक माहिती आढळून आली नाही.
• तूप, खवा, ताक व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले.
• भेसळीच्या संशयावरून तूप, खवा व ताकाचा एकूण ₹25.86 लाखांचा साठा जप्त करण्यात आला.
• नाशवंत स्वरूपाचे ताक घटनास्थळी नष्ट करण्यात आले.
• पेढीमध्ये असुरक्षित वातावरणात अन्नपदार्थाचे उत्पादन होत असल्याचे आढळून आल्यामुळे अन्न सुरक्षा परवाने व नोंदणी नियमन 2011 चे नियमन 2.1.14 नुसार नोटीस देऊन आस्थापना बंद करण्यात आलेली आहे,
विशेष म्हणजे, यापूर्वीही संबंधित संस्थेबाबत विविध तक्रारी, नियमभंग आणि आर्थिक अनियमिततेसंदर्भातील बाबी समोर आल्या असल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. 2023 साली शासनाच्या लेखापरीक्षणात आर्थिक अनियमितता निदर्शनास आल्याने संस्थेवर या आधीच सुमारे ₹1.25 कोटींची वसुली संचालक मंडळवर आकारण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे.
तसेच या आधीही 2020-21 मध्ये या संस्थेवर FDA कडुन याबाबत दंड ठोठावण्यात आलेला होता.
दूध, तूप, खवा, पेढे, गोरसपाक यांसारखे पदार्थ थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी. दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
“शुद्ध अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
— तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन #wardha



