बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
आजचा दिवस परिवर्तन,स्वाभिमान व समानतेच्या लढयाचा दिवस _ गुरुदास कामडी

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर : येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बल्लारपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कल्पना खोब्रागडे होत्या.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या समाजातही तितकाच महत्त्व असल्याचे सांगितले. “शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करून समतेचा समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना “मोबाईलचा वापर ज्ञानासाठी, सोशल मीडियाचा वापर विचारांसाठी आणि आयुष्य ध्येयप्राप्तीसाठी जगा” असा संदेश दिला. जात-पात, भेदभाव आणि अन्याय यांचा त्याग करून समानता, बंधुता आणि मानवतेचा स्वीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही गुरुदास कामडी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला गट निदेशक डी. के. ठाकरे, सौ. कळसकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर खोब्रागडे यांनी केले, तर संचलन शेन्डे सर यांनी केले. आभार प्रदर्शन घोडे सर यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.



