आपत्ती व्यवस्थापनाने केली शालेय विद्यार्थ्यांची व्यवस्था

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यात गेल्या २४ तासात मुसळधार पावसाची बरसात झाल्याने अनेक शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये,याची दक्षता घेऊन सावली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने तालुक्यात पुरामुळे बंद झालेल्या सावली ते कढोली मार्गावरील ११६ शालेय विद्यार्थ्यांची त्यांच्या गावात नेऊन देण्याची व्यवस्था करून दिली, यावेळी तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे तहसीलदार परिक्षित पाटील, नायब तहसीलदार कांबळे,गटविकास अधिकारी वासनिक, सहा.गटविकास अधिकारी तेलकापल्लीवार,गट शिक्षणाधिकारी खंडारे,पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, सावली साजाचे तलाठी साळगुले,जिबगाव साजाचे चव्हाण उपस्थित होते,
गेली चार दिवसापासून तालुक्यात संततधार पावसाने कहर केला, आज रोजी पावसाचा कहर सुरू असताना ,तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी नंतर घरी परत जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली, सावली ते कढोली मार्गावरील अनेक नाले फुगल्याने वाहतुक बंद झाली, याच मार्गावरील सिंदोळा,उसेगाव ,जिबगाव, सिर्सी, साखरी, लोंढोली, हरांबा ,कढोली आदी गावातील ११६ विद्यार्थ्यांना त्यांच्या स्व गावी पोहचवून देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने परिवहन महामंडळ, रुग्णवाहिका, प्राथमिक स्वास्थकेंद्र लोंढोली, खाजगी स्कूल बंस अशी व्यवस्था निर्माण करून रमाबाई आंबेडकर विद्यालय आणि विश्वशांती विद्यालय सावली येथील विद्यार्थ्यांना स्व गावी पोहचवून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समिती चे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.