मुक्ताई धबधबा जवळील परिसरात वाघाचा वावर
नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून धबधबा जवळील संपूर्ण परिसर बंद
चांदा ब्लास्ट
शेतशिवारातून एका साठ वर्षीय शेतकऱ्याला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबाजवळ घडल्यानंतर वनविभागाने हा धबधबा दहा दिवसांसाठी बंद केला आहे. सदर परिसरात वनविभाग कॅमेरे लावून पट्टेदार वाघावर करडी नजर ठेऊन आहे.
चिमूर तालुक्यातील डोमा गावाजवळ जंगलात मुक्ताई धबधबा आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांची गर्दी मुक्ताई धबधब्यावर होते. तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले,तलाव तुडुंब भरून वाहते आहे. लघू व मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. चिमूर तालुक्यातील डोमा गावाजवळील मुक्ताई धबधबाही भरभरून कोसळत आहे. दरवर्षी पावसात या धबधब्यावर हजारोंच्या संख्येने पर्यटकांची तुफान गर्दी असते. परंतु, याच धबधब्याजवळील तिनशे मिटर अंतरवरील शेतशिवारात शुक्रवारी ६० वर्षीय डोमळू सोनावने हा शेतात पिकांची पाहणी व जनावरे चारत असताना त्याच ठिकाणच्या परिसरातील जंगलातून येत एका पट्टदेार वाघाने उचलून नेले. यामध्ये त्या शेतकऱ्याचा मृतदेह जंगला लगत परिसरात दुसऱ्या दिवशी मिळाला आहे.
सदर प्रकरणाचे घटनास्थळ आणि मुक्ताबाई धबधबा लागूनच असल्याने आणि या परिसरात वाघाचा अजूनही वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातून वनविभागाने हा धबधबा दहा दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांसाठी मुक्ताई धबधबा हा नेहमीच आकर्षण ठरलेला आहे. परंतु, आजपासून या धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.. त्यामुळे पर्यटकांची हिरमोड झाली आहे. मुक्ताई धबधबा हा दहा दिवसासाठी बंद करून वनविभागाने या परिसरात वावर करणाऱ्या पट्टेदार वाघावर करडी नजर ठेवली आहे.