ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अरविंदो कोळसा खाण विरोधात माजी सैनिक आणि स्थानिकांच्या हक्कासाठी ९ जून पासून बेमुदत उपोषण

मरण आले तरी बेहत्तर : माजी सैनिक मनोज ठेंगणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        माजी सैनिक आणि स्थानिकांवर अरविंद रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.कोळसा खाण प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाविरोधात माजी सैनिक तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी ९ जून पासून १२ मागण्यांना घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले उपोषण सुरू राहील. यात आपणास मरण आले तरी चालेल अशी भावना त्यांनी आयोजित पत्रपरिषदेत मांडली.उपोषण मंडपात कोळसा कंपनीने वीज आणि पाणी सुद्धा दिले नाही.

      मॅपल ३६५ सेक्युरिटी सर्विसेस प्रा.लि. या सुरक्षा कंपनीस अरविंदो आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कोळसा कंपनीने ऑगस्ट २०२३ पासून टाकळी,जेना, बेलोरा नॉर्थ आणि साउथ या कंपनीच्या कोळसा खाणीत सुरक्षेचा कंत्राट दिला.माझ्या सुरक्षा कंपनीने स्थानिक प्रकल्पग्रस्तांना काम दिले. कंपनीला योग्य सुरक्षा देत असताना आणि कोळसा खान प्रबंधकाकडून आजपर्यंत कोणतीच तक्रार नसताना कंपनीस अचानक एक पत्र देऊन २२ जून २०२५ पासून आपण कार्यमुक्त व्हा. असा आदेश दिल्याचे ठेंगणे यांनी यावेळी सांगितले.

   दरम्यान कोळसा खान प्रबंधकांनी बाहेरील एस.आय.एस.सुरक्षा कंपनीला काम दिले. यात सर्वच सुरक्षा कर्मचारी बाहेरचे आहेत. माझ्या सुरक्षा कंपनीत स्थानिक ७३ कर्मचारी कार्यरत आहेत. स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त असल्याने नियमाप्रमाणे त्यांना कामावर कार्यरत ठेवणे हे कोळसा कंपनीचे काम आहे.

परंतु या पत्राद्वारे कोळसा कंपनीने स्थानिकांना रस्त्यावर आणले आहे. आपण या विरोधात कंपनीच्या प्रवेशद्वारा जवळ ९ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आपण केलेल्या मागण्यात स्थानिक अस्थाई कामगारांना स्थाई करण्यात यावे, बेलोरा गावाच्या पुनर्वस्नानंतर गावाचे आराध्य दैवत भंगाराम मंदिराचे स्थलांतर करावे, स्थानिक माजी सैनिकाची सुरक्षा कंपनीने पूर्वीप्रमाणे कार्यरत ठेवावी, सुरक्षा कंपनीने सुरक्षा कामगारांना केंद्र सरकारच्या कोल ॲक्ट प्रमाणे वेतन द्यावे,यासह इतर मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आपले उपोषण सुरू राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उपोषण मंडपास स्थानिक लोकप्रतिनिधींनी अजूनही भेट दिली नसल्याची खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. यावेळी भूपेश पेटकर, अमोल खापनवाडे, दीपक तांदूळकर, मयूर खिरटकर,संतोष लेडांगे,अमीर शेख, माधव तोडासे, प्रणय पतरंगे,गणेश बदकी, सौरभ घोनाडे,शुभम चौधरी, कुणाल गौर, राहुल नंदनवार, मनीष कोसरे, धनराज सहारे यासह इतर कामगार उपस्थित होते.

याबाबत कंपनीचे अधिकारी लक्ष्मणन राव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये