ताज्या घडामोडी

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एस टी महामंडळाचे लाखोंचे नुकसान – विद्यार्थीही झाले हवालदिल

25 ते 30 बस फेऱ्या झाल्या उशिराने

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन मिरविणाऱ्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बेपर्वा प्रवृत्तीने महामंडळाचे वारंवार नुकसान होत असल्याच्या घटना राज्यभर उघडकीस येत असतात. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका केवळ महामंडळालाच पडत नसुन एस टी वर विश्वास ठेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने महामंडळावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे.

आज सकाळपासून चंद्रपूर आगारातून सुटणाऱ्या जवळपास 25 ते 30 बस फेऱ्या वेळेवर सुटल्या नाही व ह्यासाठी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची कर्तव्याप्रती असलेली अनास्था व प्रवाशांबाबत असलेली अनास्था कारणीभूत ठरली आहे. प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर बस स्थानकावरून आज सकाळपासून तब्बल 10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या बस फेऱ्या तांत्रिक कारण पुढे करून सुटल्या नाही त्यामुळे स्थानकावर शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी व प्रवासी हताश होऊन ताटकळत होते. बस फेऱ्या न सुटल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीही शाळेत वेळेवर पोहचु शकले नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. महत्वाचे म्हणजे बस स्थानकावर इतका गोंधळ सुरू असताना बस स्थानक व्यवस्थापक व आगार प्रमुख बस स्थानकावर उपस्थित नव्हते असेही कळले आहे.

ह्याबाबतीत अधिक चौकशी केली असता तिकीट मशीनचे सर्व्हर बंद असल्याने फेऱ्यांचा नियोजन होऊ शकले नाही परिणामी बस फेऱ्या झाल्या नाही असे कळले मात्र महामंडळाच्या नियमाप्रमाणे जर तिकीट मशिन मधे काही तांत्रिक बिघाड अथवा अडचण असल्यास जुन्या पद्धतीने कागदी तिकीट देण्याचा नियम आहे मात्र बेपर्वा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे तिकीट ट्रे देऊन बस फेऱ्या नियोजित वेळेत सोडता आल्या असत्या. अधिकाऱ्यांनी असा कुठलाही निर्णय घेतला नसल्यानें महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व इतर प्रवाशांना झालेला विलंब पर्यायाने सहन करावा लागलेला मनस्ताप केवळ अधिकाऱ्यांच्या बेपर्वा कारभारामुळे झाला असल्याचे संतप्त प्रवाशांचे म्हणणे असुन निदान महामंडळाचे झालेले लाखोंचे नुकसान अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावे अशी मागणीही संतप्त प्रवाशांनी चांदा ब्लास्ट सोबत बोलताना केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये