ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देणार – पालकमंत्री

जिल्हा बँकेच्या ठेवी वाढीसाठी प्रयत्न ; जिल्हा बँक नुतनीकरणाची घेतली जबाबदारी ; सहकारातून समृद्धीकडे मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आर्थिक बळकट करणारी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सहकारातून समृद्धी निर्माण करणे व सहकाराला बळकट करण्यासाठी सहकार विभाग, राज्य सहकारी बँक मुंबई व वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मेळाव्याचे आयोजन दत्ता मेघे सभागृह सावंगी येथे करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर हे होते. आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी.,अपर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील, व्यवस्थापकीय संचालक राज्य सहकारी बँक दिलीप दिघे, सहकार विभागाचे माजी अप्पर आयुक्त एस.बी. पाटील, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲङ सुधीर कोठारी, राज्य सहकारी बँकेचे अशोक माने, प्रगतीशील शेतकरी प्रशांत इंगळे, विवेक जुगादे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 आर्थिक संकटात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य शासनाने 163 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले असून रिजर्व बँकेने सुध्दा परवाना दिला आहे. त्यामुळे आता बँकेने सक्षमीकरण करण्याकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांचा सावकरांकडून कर्ज घेण्याचा कल कमी करुन अधिका अधिक शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेने प्रयत्न करावे. केंद्र शासनाने सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून राज्यातील 12 हजार सेवा सहकारी संस्थांचे लवकरच संगणकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थाचा सुध्दा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. भोयर म्हणाले.

  हिंगणघाट शाखेच्या इमारतीचे नुतणीकरण कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत, वर्धा मुख्य शाखेचे नुतणीकरण व संगणकीकरण राज्य शासनामार्फत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

    वर्धा जिल्हा बँकेत पाच लाखापर्यंतच्या ठेविला विमा संरक्षण आहे मात्र त्यावरील सर्व ठेवींना राज्य सहकारी बँकेचे विमा संरक्षण असेल अशी हमी देऊन सामान्य माणसाचा पैसा अर्थ कारणात आणण्याचे काम केवळ सहकारच करू शकतो असे मत विद्याधर अनास्कर यांनी केले. बँकेनी केवळ ठेवी घेऊन चालणार नाही तर बँकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन करुन देण्यासोबतच कर्जाची वसुली सुध्दा वेळेवर होणे गरजेचे आहे. यासाठी बँकेच्या कर्मचा-यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन आत्मियतेच्या भावनने कामे करावी असेही श्री. अनास्कर म्हणाले.

सहकार क्षेत्र हे व्यापक क्षेत्र आहे. याला समृध्दीकडे नेणे गरजेचे असून यासाठी बँकेने शेती कर्जासोबतच बिगर शेती कर्ज देण्याकडे सुध्दा भर द्यावा. सोबतच महिला सक्षमीकरण, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी बँकेने पशुपालनासाठी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आमदार सुमित वानखेडे म्हणाले.

   जिल्हा बँकेचे सक्षमीकरण करण्यासोबतच ठेवी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकांचा आजही सहकारी बँकेवर विश्वास आहे. शेती व शेतकरी तसेच सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्वतः ची ठेव सहकारी बॅंकेत ठेवण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी विविध संस्था व वैयक्तिकरित्या ठेवीचे धनादेश जिल्हा बॅंकेला सुपूर्द केले. आमदार सुमित वानखेडे यांनी आपल्या व पत्नीच्या नावे प्रत्येकी पाच लाखाची ठेव जिल्हा बँकेत ठेवण्याचे घोषित केले.

  कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सीमा पांडे यांनी केले. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सक्षमीकरण या विषयावर अपर निबंधक तथा सहसचिव सहकार विभाग संतोष पाटील यांनी तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेपुनरुज्जीवन, दृष्टिकोन व कार्यपद्धती या विषयावर सेवा निवृत्त अपर आयुक्त एस. बी. पाटील यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार राजेंद्र कौशडीकर यांनी मानले.

बँकेच्या सक्षमीकरणात योगदान दिल्याबद्दल तसेच बँकेला वैयक्तिक व संस्थात्मक ठेवी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सहकारी संस्थेचे पदाधिकारी, ठेवीदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये