पिपरी गावाला आले बेटाचे स्वरूप
पिपरी गावासह अनेक गावांचा संपर्क तुटला
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सततच्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आल्याने अखेर मध्यरात्रीपासून तालुक्यातील पिपरी गावाचा संपर्क तुटला आहे.या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले असून या परिसरातील पिपरी या गावासह कोची व घोणाड या गावातील गावकरी आपापल्या गावातच अडकले आहे. पिपरी गावच्या मागच्या भागातील घरापर्यंत पुराचे पाणी आले असून पिपरी वरून भद्रावती शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन किलोमीटर पर्यंत पाणी पसरले असल्यामुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनाही या तिन्ही गावात पुरामुळे जाणे शक्य नसल्यामुळे केवळ मोबाईल वरून या गावांशी ते संपर्क साधून पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहे. वर्धा नदीचे पाणी सारखे वाढतच असल्यामुळे गावकऱ्यांनी जनावराचा चारा व आवश्यक ते सामान सुरक्षित ठिकाणी हलविणे सुरू केले आहे तर पूर लवकर ओसरावा यासाठी गावकऱ्यांनी गावातील मंदिरामध्ये भजन सुरू केले आहे. तालुक्यात अद्यापही पाऊस सुरूच असल्यामुळे पूरस्थिती तीव्र होण्याचा धोका कायम आहे.
त्याच प्रमाणे भद्रावती तालुक्यातील कोची गावा जवळील वर्धा नदीला मिळणाऱ्या नाल्यावरील पुलावर पुराचे चार फूट पाणी आल्याने पिपरी, कोचीस, घोणाड व मुरसा मार्ग दिनांक 27 रोज गुरुवारला सायंकाळी चार वाजेपासून बंद झालेला आहे. या नाल्यातील पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरल्याने सर्व शेती जलमय झाली आहेत. त्यामुळे या शेतातील कापूस,सोयाबीन व भाजीपाला पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. दरम्यान पिपरी गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने व पाणी सारखे वाढतच असल्याने मध्यरात्रीपर्यंत पिपरी या गावाचाही भद्रावती शहराशी संपर्क तुटण्याची भीती पिपरी येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर ठोंबरे यांनी बोलून दाखवली आहे. कालपासून तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असल्याने वर्धा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वेगाने वाढ होत असून नदी फुगल्यामुळे कोची नाल्याचे पाणी थोपुन घोणाड,मुरसा गावाकडे जाणाऱ्या पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे व हे पाणी वाढतच आहे. त्यामुळे पिपरी ते कोची घोणाड व मुरसा हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.