Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

श्री बालाजी महाराजांचा कार्तिक लळीत उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजाचे आराध्य दैवत व प्रतितिरुपती म्हणून ख्याती असलेल्या श्री बालाजी महाराजांचा कार्तिक लळीत उत्सव दि. २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता काल्याच्या कीर्तनानंतर भक्तिमय वातावरणात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आश्विन महिन्यात घटस्थापनेपासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान मंडपोत्सव, पालखी मिरवणूक व लळीत असे विविध धार्मिक उत्सव आनंदमय वातावरणात पार पडले. श्री बालाजी महाराजांचा यात्रा महोत्सव दरवर्षी दोन टप्प्यांमध्ये पार पडतो. पहिला टप्पा आश्विन शुद्ध १ ते अश्विन कृ. ४, या आश्विन यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहतात.

यात्रेचा दुसरा टप्पा कार्तिकी यात्रा, या उत्सवाला दि.११ नोव्हेंबर, २०२४ रोजी सुरुवात झाली. या दिवशी मंडपोत्सव संपन्न झाला. या मंडपोत्सवासाठी १६ कापडी मंडप उभारण्यात आले. दि. १४ ते २४ नोव्हेंबर, २०२४ दरम्यान श्रींच्या मंदिरासमोर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्री बालाजी संस्थानच्या वतीने मंदिरासमोर स्टीलच्या कठड्यांवर दिव्यांची आरास ठेवून रोषणाई करण्यात आली. हा दीपोत्सव कार्तिक लळीतोत्सवापर्यंत रोज चालू होता. श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी, विशेषत: महिलांनी दिव्यामध्ये तेल घालून दिवे प्रज्वलित ठेवले. त्यामुळे मंदिरासमोरील वातावरण तेजोमय होते.

२१ ब्रह्मवृंदांकडून घटस्थापनेपासून सुरू असलेल्या यात्रेच्या अनुष्ठानाची सांगता दि. १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी झाली. दरम्यान महाद्वाराजवळील मारुतीच्या बैठकीवर दि.१५ ते २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत बोरकर व त्यांच्या गोंधळी मंडळाकडून पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी नियोजित वेळेत म्हणजेच ५:४५ वाजता ह.भ.प. जयंतबुवा हरदास यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय वातावरणात गवळी समाजातर्फे दहीहंडी फोडून कार्तिक लळीत पार पडले. नंतर ब्राह्मण वृंदांनी डोक्यावर दिवा घेऊन श्री बालाजी मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर टाकळकरांनी लाह्या व बत्तासे प्रसाद वाटप केला व पुजारी वृंदांनी बर्फीचा प्रसाद वाटप केला.

यावेळी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, संस्थानचे व्यवस्थापक किशोर बीडकर, आशिष वैद्य, संस्थानचे कर्मचारी, ब्राह्मण वृंद व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये