भद्रावती महसुल विभागाचा दोन प्रकरणात अर्थपूर्ण संबंध
पत्र परिषद माजी सरपंच गणेश जीवतोडे यांचा आरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आक्षेपाच्या ४ दिवस आधी तहसीलदाराचा कार्यभार असलेले नायब तहसीलदार यांनी तलावातील माती उत्खननाला परवानगी दिली. तसेच वीट भट्टी मुळे शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यावर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याचे पत्र देऊन ४ महिन्याचा काळ लोटून सुद्धा तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार झाला असल्याचा आरोप माजी सरपंच गणेश नारायण जीवतोडे यांनी पत्रपरिषदेत केला.
तालुक्यातील कढोली या क्षेत्रातील मामा तलावातील माती शेतीत टाकण्याची परवानगी सतीश शंकर मडावी यांनी २९ मे २०२३ ला एका निवेदनाद्वारे सिंचाई विभागाकडे केली आणि त्याच दिवशी तलाठ्याने सुद्धा आपला अहवाल दिला. यावर्ती तहसीलदारांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून दिनांक ५ जुलैला याप्रकरणी आक्षेप सुनावणी ठेवली. परंतु प्रभारी तहसीलदार शंकर भांदककर यांनी आक्षेपाच्या तीन दिवस आधीच २ जूनला माती उत्खननाची परवानगी दिली. तलावातील ३०० ब्रास माती शेतात टाकण्याऐवजी सर्वे नंबर २५ क्षेत्रात १.७८ हेक्टर आर जागेवर उभारण्यात आलेल्या वीटा भट्टीवर टाकण्यात आली. ही माती व्यवसायासाठी वापरात आल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे असा आरोप जीवतोडे यांनी यावेळी केला. याच वीट भट्टीच्या शेजारी असलेल्या सर्वे नंबर २६ / ४ चे शेतमालक विठ्ठल वांढरे यांच्या शेताचा काही भाग या वीट भट्टीमुळे खराब झाला. वीट भट्टी मालक निखिल वानखेडे हा ऐकत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु चार महिन्याचा काळ लोटून सुद्धा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रास केराची टोपली दाखविल्याचा आरोप वांढरे यांनी केला. वरील दोन्ही प्रकरणात येतील महसूल विभाग वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करीत असल्याने ते अवैद्यरीत्या काम करणाऱ्याच्या मते वागत असल्याचे दिसते. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणार असल्याची माहिती यावेळी माजी सरपंच गणेश जीवतोडे व विठ्ठल वांढरे त्यांनी पत्र परिषदेत दिली. या पत्र परिषदेत अशोक निखाडे व नत्थू गाडगे उपस्थित होते.