बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला
बल्हारशाह कळमणा जंगल परिसरात वाघाचा वावर ;
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
नागरीकांनी वनात प्रवेश करु नये – वनविभागामार्फत आवाहन
बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोर्टिमक्ता येथील रहिवासी श्री. वामन गणपती टेकाम, वय ५९ वर्ष हे दिनांक १४/०५/२०२४ ला सकाळी ८.३० वाजताचे सुमारास नियतक्षेत्र कळमणा मधील वनात बकरी चारण्यासाठी गेला होता.
गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना सदर इसम वनात बकरी चारत असल्याचे दिसताच त्यांना वनाच्या बाहेर काढण्यात आले व परत वनकर्मचारी हे गस्तीवर समोर निघुन गेले. परंतु सदर इसम हा पुन्हा बकऱ्या चारण्यासाठी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमणा मधील राखीव वनखंड क्रमांक ५१४A मध्ये गेला असता दुपारी १२ वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघाने हल्ला करुन त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले.
मौकयावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात श्री. वामन गणपती टेकाम यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आले.
सदर परिसरात गस्त वाढणविण्यात आलेली असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता २० ट्रॅप कॅमेरे व १ Live कॅमेरा लावण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. बल्हारशाह कळमणा जंगल परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरीकांनी वनात प्रवेश करु नये असे आवाहन वनविभागा मार्फत करण्यात येत आहे.