पिकविम्यासाठी शेतकऱ्यांच्या नावा संदर्भात असलेली अट शिथिल करा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा भरण्याची सुरुवात झाली आहे. मात्र पिक विमा अर्ज भरण्यासाठी सातबारा, आधार कार्ड व बँक पासबुक वरील शेतकऱ्याचे नाव सारखेच असावे ही आट घातल्याने अनेक शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत आहे. परिणामी नावात काही अंशतः बदल असलेले शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पिक विमा अर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावासंदर्भात असलेली आट तात्काळ शिथिल करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी सर्वसमावेशक पिक विमा राबविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी 15 जुलै पर्यँत पिक विमा अर्ज नोंदणी करून प्रधानमंत्री पीक योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड वरील नाव, सातबारा वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखेच असावे त्यामध्ये अंशत: देखील बदल नसावा अशी जाचक आट घालून देण्यात आली आहे.परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्ड वरील नावात व बँक खात्यावरील नावात अंशतः बदल असल्याने अशा शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण येत आहे. या जाचक अटीमुळे नावात काही अंशत: बदल असलेले अनेक शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजने पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक योजनेचा लाभ मिळावा म्हणून पिक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांच्या नावासंदर्भात असलेली अट तात्काळ शिथिल करून तांत्रिक अडचण दूर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, तालुका सचिव जहीर पठाण,जना मगर,शहराध्यक्ष विजय खांडेभराड,अजमत खान, शंकर वाघमारे, संजय लोखंडे, असलम खान आदींनी केली आहे.