जिवती भुमिअभिलेख कार्यालयातील कारभार प्रभारीवरचं

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने निकाली लागावी, यासाठी जिवती येथे भुमिअभिलेख कार्यालय उघडण्यात आले मात्र येथील उपअधिक्षक पद २०१३ पासून भरलेच नाही अजूनही हे कार्यालय प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू असून हे प्रभारी अधिकारी या कार्यालयाकडे फिरकूनही बघत नसल्याने नागरिकांसह येथील कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वादग्रस्त १४ गावांतील जमिन मोजणी प्रक्रिया सुरू आहे.या कामांसाठी बहुतांश कार्यालयातील कर्मचारी मोजणी करिता जातात त्यामुळे कार्यालयात कामांसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्नांचे समाधान होत नाही.परिणामी जमिन मोजणी व इतर प्रशासकीय कामकाज खोळंबली जातात.कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.
कर्मचारी कार्यालयात असले तरी अधिकाऱ्यांचा अधिकार त्यांना गाजवता येत नाही.प्रभारी अधिकारी जिवतीत पायही ठेवत नाही आणि शासन येथील उपअधिक्षक रिक्त पद भरत नाही त्यामुळे येथील नागरिकांची कामे वेळेवर होत नाही याचा त्रास नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील उपअधिक्षक पद तातडीने भरून शेतकऱ्यांची कामांसाठी होणारी दमछाक थांबवावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने अध्यक्ष सुदाम राठोड यांनी केली आहे.