अमृत महोत्सवी वर्षात गरीब, गरजूंना दिलासा देण्याचा प्रयत्न करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्हाधिकाऱ्यांनी केला विरमाता व विरपत्नींचा सत्कार

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
अविनाश नागदेवे वर्धा
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. या महोत्सवाच्या समारोपानिमित्त विविध कार्यक्रम राबवितांना सर्वसामान्य गरीब, गरजू नागरिकांना दिलासा कसा देता येईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहन समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहन प्रसंगी शुभेच्छापर संदेश देतांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ह्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॅा.सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचा 76 व्या वर्धापनदिनामित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात विरमाता व विरपत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विरमाता शांताबाई वरहारे, विरपत्नी जयश्री चौधरी व अनिता इवनाते यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने देण्यात येणा-या उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योग पुरस्कार जयपुरकर फार्मासुटिकल ओपीसी कंपनीला प्रथम व मे सेजल फूड प्रॉडक्ट उद्योगाला व्दितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.