येरमी येसापूर येथील जल जीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट
कंत्राटदारावर कारवाई करण्याची शेळके यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील ग्रामपंचायत येरमी येसापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या विहिरीचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाज पत्रकाप्रमाणे खोदकामही करण्यात आले नाही.सदर कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी शिवदास शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
प्रत्येक नागरिकांना त्याच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी ‘हर घर जल’ योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे.कामाची संख्या व योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार यांना अनुभव नसतानाही कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने या सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे प्रकार उघड झाला आहे.असाच प्रकार येरमी येसापूर येथे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील कामात बघायला मिळत आहे विहिरीचे खोदकाम अंदाज पत्रकाप्रमाणे केले नाही आणि बांधकाम सुध्दा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले आहेत.त्यामुळे लाखो रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेली महत्वाकांक्षी योजना अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता नाकारता येत नसून सदर कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी शिवदास शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.