महाराष्ट्राची जिवनवाहिनी ठप्प – एस टी कर्मचारी पुन्हा संपावर
प्रलंबित मागण्या पुर्ण होण्यासाठी उगारले संपाचे हत्यार - प्रवाशांची होणार हेळसांड

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे राज्यभराप्रमाणेच चंद्रपूर विभागातही प्रवाशांची कोंडी होताना दिसत आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ह्या संपाचा सर्वाधिक फटका विद्यार्थी तसेच रोज बस ने प्रवास करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांना बसणार असुन ह्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
एस टी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी असेच संपाचे हत्यार उगारले होते त्यावेळी राज्यभरातील अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या होत्या त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुखवटा पाळत जवळपास सहा महिने बस सेवा खंडित केली मात्र तत्कालीन सरकारने कंत्राटी चालक वाहक नेमून काही काळ बस सेवा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या काही मागण्या मान्य केल्याचे शासनाने जाहीर केले व इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटूनही एस टी महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची व शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते तसेच इतर सुविधा देण्याची जोरकस मागणी अद्यापही मान्य न झाल्याने अखेरीस एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.
एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ह्या संपात सर्व कर्मचारी संघटना सामील असल्याने चंद्रपूर विभागात जवळपास सर्वच आगारात कडकडीत बंद पाळण्यात येत असुन चंद्रपूर आगार 100%, राजुरा 99%, वरोरा आगार, ब्रम्हपुरी व चिमूर आगार 98% बंद असल्याचे कळले आहे.
एस टी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांच्याशी चर्चा करून आपल्या मागण्या मांडल्या होत्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत अधिसूचना काढण्याचे मान्य केले मात्र अजुनही त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेरीस राज्यातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
१) राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे रा.प. कामगारांना वेतन देण्यात यावे.
२) महागाई भत्याची माहे जुलै, २०१८ ते जानेवारी, २०२४ या कालावधीची थकबाकी अद्याप रा.प. कामगारांना मिळोलली नाही. सदरची सर्व थकबाकी कामगारांना त्वरीत देण्यात यावी.
३) शासकीय कर्मचा-यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर रा.प. कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतुद असतानाही त्यामध्ये प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भग केलेला आहे. याबाबत रा.प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६,२४ टक्के माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के
माहे नोव्हेंबर २०२१ पासून रा.प. नागगारांना लागू केला. परंतु माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीची वार्षिक चेतनवाढीची व परशाडे भत्याची थकबाकी रा.प. कामगारांना अद्याप मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी.
४) सन २०१६-२०२० या कालावधीसाठी वेतनवाढीपोटी रु.४८४९ कोटी जाहिर केले. सदर रु.४८४९ कोटीचे पूर्ण वाटपही झालेले आही. तरी रु.४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कमेचे कामगारांना वाटप करण्यात यावे.
५) एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात माहे नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे रु.५०००/-, रु.४०००/- व रु. २५००/- वाढ करण्यात आली. परंतु अशी वाढ देताना सेवाजेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. सदरच्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट रु.५०००/- लागू करण्यात यावेत.
६) सध्या एस.टी. कामगारांना लागू असलेल्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना (इनडोर /आऊटडोर) एस.टी. कामगारांना लागू करण्यात यावी.
७) एस.टी. कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या एस. टी. बसेसमध्ये मोफत पासाची सवलत फरक न भरता लागू करण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त एस.टी. कामगारांना ६ महिन्याऐवजी १ वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा.
ह्या मागण्यांसाठी एस टी कर्मचारी एकवटले आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे विभाग अध्यक्ष राजेश सोलापण, विभागीय सचिव विनोद दातार, कार्याध्यक्ष मोती सिंग चव्हाण, दत्ता बावणे ह्यांच्या नेतृत्वात कृती समितीचे सर्व पदाधिकारी, प्रत्येक आगारातील सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व बहुसंख्य एसटी कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर विभागात कडकडीत बंद पाळला असुन प्रवाशांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.