ताज्या घडामोडी

मुनगंटीवारांना दिल्ली दुरच – प्रतिभा धानोरकरांचा दणदणीत विजय

25 व्या फेरी अखेर प्रतिभा धानोरकर 2,51,422 मतांनी आघाडीवर - विजयाची औपचारिक घोषणा बाकीआघाडीवर -

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाली असुन वृत्त लिहीत पर्यंत 25 फेऱ्यांची मतमोजणी पुर्ण झाली असुन ह्याची आकडेवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर क्षेत्रात मतमोजणीच्या एकुण 28 फेऱ्या होणार असुन उर्वरित फेऱ्यांच्या मोजणी अखेरीस निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घोषित 25 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांना 6,94,909 तर भाजपचे सुधिर मुनगंटीवार ह्यांना 4,43,477 मतदारांनी आपली पसंती दिली.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चुरशीची होईल असा अंदाज सुरुवातीपासून बांधल्या जात होता मात्र मतमोजणी अंती ही लढत एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ह्या लढतीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांनी दणदणीत विजयाकडे सुरुवातीपासूनच दमदार वाटचाल केल्याचे दिसत असुन राज्याचे मंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांना लोकसभा क्षेत्रातील एकाही विधासभा मतदार संघात कोणत्याही फेरीत आघाडी घेता आली नाही हे विशेष.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 15 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. ह्या क्षेत्रात काँग्रेस पक्षाने तत्कालीन खा. बाळु धानोरकर ह्यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्यांना उमेदवारी दिली तर भाजपने राज्याचे वन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले विकासपुरुष अशी बिरुदावली लाभलेले सुधिर मुनगंटीवार ह्यांना ह्या क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्याची जबाबदारी दिली होती. अत्यंत अटीतटीच्या संघर्षानंतर उमेदवारी मिळविलेल्या प्रतिभा धानोरकर ह्यांनी 25 व्या फेरी अखेर सुधिर मुनगंटीवार ह्यांच्यावर निर्णायक आघाडी मिळविली असुन त्यांच्या विजयाची घोषणा केवळ औपचारिकताच उरली आहे.

विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर ह्यांनी टपाली मतांसह ई व्ही एम द्वारे देण्यात आलेल्या मतांच्या मोजणीच्या प्रत्येक फेरीत सुधिर मुनगंटीवार ह्यांच्यावर आघाडी घेतली असुन त्यांनी घोषित 25 व्या फेरी अखेर 2 लाख 51 हजार 422 मतांची आघाडी घेतली असुन मतमोजणीच्या 6 फेऱ्या अजुनही शिल्लक आहेत त्यामुळे मतदारांचा कल कायम राहिल्यास त्यांना मोठी आघाडी मिळण्याची खात्री आहे.

सुधिर मुनगंटीवार ह्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात लोकसभा निवडणुकीतूनच केली होती मात्र त्यांना ह्यापूर्वी लढविलेल्या दोन्ही निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी विधानसभेचा मार्ग स्वीकारून राज्याच्या राजकारणात आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. मात्र यंदा त्यांची मानसिक तयारी नसतानाही पक्षाने त्यांना लोकसभेची जबाबदारी दिल्याने त्यांनी पुन्हा एकदा किल्ला लढविला मात्र ह्यावेळीही विजयने त्यांना हुलकावणी दिली असुन सुधिर मुनगंटीवारांसाठी अजुनही दिल्ली दुरच असल्याचे दिसुन आले. विशेष म्हणजे ते प्रतिनिधीत्व करीत असलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातही त्यांच्या पदरी निराशा पडली असुन त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातही त्यांना एकाही फेरीत आघाडी घेता आलेली नाही.

दुसरीकडे विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्यांना सुरुवातीपासूनच उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार ह्यांनी देखिल चंद्रपूर मतदार संघावर दावा सांगितला होता मात्र आपल्या पतीच्या निधनानंतर ह्या क्षेत्राची उमेदवारी आपलीच असल्याचा दावा करून प्रतिभा धानोरकर ह्यांनी शिवानी वडेट्टीवार ह्यांच्या पाठोपाठ दिल्ली गाठली. दिल्लीतही उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांची भेट घेऊन उमेदवारी मिळवुन देण्यासाठी मध्यस्थी करण्याची गळ घातली होती.

पवारांच्या मध्यस्ती नंतर अखेरीस प्रतिभा धानोरकर ह्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ह्यांची नाराजी, त्यांनी चंद्रपूर क्षेत्रात प्रचारा पासुन ठेवलेली अलिप्तता ह्यामुळे प्रतिभा धानोरकर ह्यांनी स्वबळावर निवडणूक लढवून चंद्रपूर लोकसभा क्षेत्र विराट अंतराने काबिज करून पक्षाने दाखविलेला विश्र्वास सार्थ केला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये