अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जिवती बंदची हाक
उद्यापासून स्थानिक बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय ; आंदोलन चिघळण्याची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- गेल्या पाच दिवसांपासून १४ मागण्या घेऊन जिवती तहसील कार्यालया समोर ९ शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून जवळपास सर्वच उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली गेली आहे मात्र संपूर्ण मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय अन्नत्याग उपोषण मागे घेणार नसल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले. उपोषणाला समर्थन देण्यासाठी उद्यापासून मागण्या पुर्ण होईपर्यंत स्थानिक बाजारपेठ बंद करण्याचा ठाम निर्णय झाल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपोषणाला बसलेल्या सर्वच शेतकरी पुत्रांची वैद्यकीय तपासणी दररोज केली जात आहे. त्यात अनेकांची प्रकृती खालावली गेली असुन त्या उपोषण कर्त्यांना उपोषण स्थळीच उपचार करण्याची विनंती केली जात असली तरी वैद्यकीय अधिकारी मात्र याला नकार देत आहे.
जमिनीच्या पट्ट्यांच्या मागणीसह इतर १३ मागण्या घेऊन उपोषणाला बसलेल्या शेतकरी पुत्रांना विविध पक्ष्यासह स्थानिक व्यापारी तालुक्यातील अंगणवाडी सेविका संघटना,आशावर्कर संघटना, आटो चालक मालक संघटना, शाळा महाविद्यालय विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, यांचा जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.वरिल संपूर्ण मागण्या हक्काच्या असलल्याने दिवंसेदिवस या उपोषणाला पाठिंबा व समर्थन देणाऱ्या संघटनेत वाढ होत आहे.मागील ६३ वर्षांपासून अतिदुर्गम भागात कुठल्याही सोयी-सुविधा नसतानाही हलाकीचे जीवन जगणाऱ्या शेतकरी बांधवांना आतातरी जमिनीचा मालकी हक्क देऊन जमिनीचा खरा हक्कदार बनवा त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक कामात येणारे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे अशा मागण्या घेऊन शांततेत अन्नत्याग उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणाला शासन प्रशासनाने अजूनही गंभीरतेने घेतले नाही.अजून काही दिवस दुर्लक्ष केल्यास नक्कीच पहाडवरील शेतकरी बांधव, शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरेल यात शंका नाही.