शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अँलर्जी
कार्यालयात येण्यास विलंब परत जाण्याची सुध्दा घाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम
सिंदेवाही – ग्रामीण भागात शासनाच्या विविध विभागांची कार्यालय आहेत. येथे स्थानिक पातळीवर नेमून दिलेले शासकीय कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर हजर राहात नसल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येत असून कार्यालयीन काम करण्यास चकरा माराव्या लागतात.
बहुतांश शासकीय कर्मचारी आपल्या सोयीनुसार कर्तव्याच्या ठिकाणी बाहेरून ये-जा करीत असतात. परंतु, तेथेही वेळेचे बंधन
पाळले जात नसल्याने वेळेवर ते कार्यालयात हजर होत नाही. वेळेची शिस्त नसल्याने कामकाजासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना ताटकळत बसून राहावे लागते. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठीच शासनाच्या विविध विभागांमध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, हे कर्मचारी वेळेवर कर्तव्याच्या ठिकाणी पोहोचत नसल्याने अशा कर्मचान्यांना शासनाकडून मिळणाऱ्या भरमसाठ
पगाराचे फलीत काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
ग्रामीण भागात कर्तव्य बजारवणारे बहुतांश कर्मचारी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर अनेक अधिकारी नागपूर-बम्हपुरी- चंद्रपूर शहरातून ये-जा करतात. अशा बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी ठिकाणी वेळ कमी व प्रवासात अधिक वेळ घालवत असल्याचे निदर्शनास येते. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास
विलंब होतोच मात्र परत
जाण्याचीसुध्दा घाई असते.
परिणामी कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यात अशा कर्मचाऱ्यांना कोणताही रस राहात नसल्याने एकाच कामासाठी नागरिकांना कित्येक दिवस कार्यालयात चकरा माराव्या लागतात. शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची व कार्यालयीन वेळ पाळण्याची शिस्त लावावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.