आंबेडकरी विचार संघर्ष समितीचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा
केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन सादर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
मागील काही महिन्यांपासून देशात व राज्यांमध्ये आदिवासी, दलित, बौद्ध,बहुजन व अल्पसंख्यांक बांधवांवर धर्मांध शक्तींकडून अन्याय व त्याच्यावर होत असून त्यात सारखी वाढ होत आहे. अनेकांवर प्राणघातक हल्ले झाले असून मणिपूर मध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहे.
या सर्वांवर अंकुश घालण्यात केंद्र व राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.या सर्व घटनांच्या व केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ भद्रावती येथील आंबेडकरी विचार संघर्ष संघटनेतर्फे दिनांक 17 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजता भद्रावती तहसील कार्यालयावर एक भव्य निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी प्रवेशद्वारापासून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा बुद्ध लेणी, नाग मंदिर चौक व मुख्य रस्त्याने होत भद्रावती तहसील कार्यालयावर धडकला.
मोर्चात राज्य तथा केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. सदर मोर्चात नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सदर मोर्चात शहरातील गोंडी धर्मीय एकता संघटन, समस्त बौद्ध विहार कमिटी, समस्त बौद्ध महिला मंडळ, समस्त बौद्ध युवक मंडळ, सर्व शाखीय माळी समाज तथा हजरत टिपू सुलतान युवा फाउंडेशनचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.