ताज्या घडामोडी

स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले राजकीय नेत्यांनी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

_खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेतकर्‍यांना मिळावे, यासाठी शासनाचा युवा पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी केलेली आत्महत्या ही शेतकर्‍यांसाठीचे ‘बलिदान’ असल्याच्या भावना रक्षाविसर्जन कार्यक्रमातून शिवनी आरमाळला रविवार १६ मार्च रोजी उमटल्या. सावडल्यानंतर राखेचा ‘जलदान’ विधी शिवणी अरमाळ मधील आनंदस्वामी धरणात होत असताना, इकडे बुलढाण्यात येळगाव धरण परिसरात १७७ कोटी ६० लाख रुपये खर्च करून आणलेल्या खडकपूर्णातील पाण्याची ‘जलपूजन’ सुरू होते. एकीकडे ८ किलोमीटरवर खडकपूर्णाचे पाणी येत नसल्याने कैलासने आत्महत्या केली, तर दुसरीकडे त्याच शासनाने अब्जावधी रुपये खर्च करून ८० किलोमीटर दूर बुलढाण्यात पाणी नेले.. ज्या दिवशी त्या तरुण शेतकर्‍यांचा शेतकर्‍याच्या राखेचा जलदान विधी असतो, त्याच दिवशी बुलढाण्यात त्याच दिवशी व त्याच वेळेला बुलढाण्यात त्याच पाण्याचे जलपूजन करणे.. हे सरकारने शेतकर्‍याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी करून बुलढाण्यातील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जे आहेत तेच खासदार आता इथे उपस्थित आहे.. खरा भूमिपुत्र अशाप्रकारे जीवन संपत असेलतर इतर नेत्यांना भूमिपुत्र म्हणून घेण्याचा काय अधिकार? असा सडेतोड सवाल त्यांनी केला. तर त्यावर ना. प्रतापराव जाधव यांनी जे शेतीतच जात नाही अशा नेत्यांना शेतकर्‍यावर बोलण्याचा काय अधिकार? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आपली पातळी पाहून बोलावे.. असे उत्तर दिले. तर कैलास नागरे यांच्या मागण्याचा पाठपुरावा आपण सुरू केला होता, शिवनी आरमाळसाठी दोन कोटीच्या कामाची प्रशासकीय मान्यताही मिळाली होती..पुढचे कामही लवकरच चालू होणार होते. त्यामुळे झाले ते अतिशय दुदैवी असल्याचे सांगून, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नालाच आपले पहिले प्राधान्य राहील.. असे आ.मनोज कायदे यांनी सांगून कैलासला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. आजच्या रक्षाविसर्जन सोहळ्यात कैलासच्या बहिणीने व्यक्त केलेले भावनिक मनोगत गहिवर आणणारे होते !_

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्यांना राज्यपालांच्या हस्ते राज्य शासनाचा ‘युवा शेतकरी पुरस्कार’ मिळाला होता, त्याच कैलास अर्जुनराव नागरे यांनी १३ मार्च या होळीच्याच दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. अंढेरा परिमंडळातील १४ गावांना खडकपूर्णाचे पाणी कालव्याद्वारे मिळावे, या मागणीसाठी आत्महत्या केली. अंत्यसंस्काराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तोताराम कायंदे तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तर कैलासच्या अंतिम इच्छेनुसार रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी आटोपायचे असल्यामुळे, रक्षाविसर्जन कार्यक्रम रविवार १६ मार्च रोजी ठेवण्यात आला होता. यावेळी केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव, आ. मनोज कायंदे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, उबाठा. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सिद्धेश्वर आंधळे, भगवानराव मुंडे, भगवान नागरे, प्रवीण गीते, संदीप शेळके, भारत पाटील, गजानन अहमदाबादकर तसेच अनेक शेतकरी संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

_अतिशय शोकाकुल वातावरणात रक्षाविसर्जन सुरू झाले, मात्र एकीकडे ही सुरू असताना दुसरीकडे बुलढाण्यात याच खडकपूर्णा धरणातून गेलेल्या पाण्याची ‘जलपूजन’ सुरू आहे.. त्यासाठी बुलढाण्याच्या आमदाराने करोडो रुपये शासनाकडून आणून हे काम करून घेतले, मात्र इथे अनेक वर्षापासून भूमिपुत्र म्हणून घेणारे लोकप्रतिनिधी असताना त्यांना हे का जमले नाही ? असा सवाल आपल्या श्रद्धांजलीपर मनोगत आतून प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी उपस्थित करून.. एक भूमिपुत्र पाण्यासाठी आत्महत्या करत असेलतर दुसर्‍यांना भूमिपुत्र म्हणवून घेण्याचा काय अधिकार ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत, १७७ कोटी ६० लाख रुपये खर्च करून खडकपूर्णा धरणातून ८० किलोमीटर दूर पिण्यासाठी पाणी जर बुलढाण्याला जात असेलतर केवळ ८ किलोमीटर दूर असणार्‍या १४ गावातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी का मिळू शकत नाही? असा सवाल त्यांनी करून आज इकडे रक्षाविसर्जन असताना, तिकडे जल पूजन करणे म्हणजे हे सरकार किती असंवेदनशील आहे..याची प्रचिती येत असल्याचे ते म्हणाले.

शेवटी श्रद्धांजलीपर बोलताना ना. प्रतापराव जाधव यांनी मोजक्या शब्दात कैलासला आपली श्रद्धांजली अर्पण करत, मी कैलासच्या मुलांचा माझ्या संस्थेत शिक्षणाचा पूर्णपणे खर्च उचलतो हे त्यांनी जाहीर करुन धरणांपेक्षा नदीजोड प्रकल्पामुळे खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना शाश्वत सिंचन मिळेल.

असे सांगून आरोप करणार्‍यांनी आपली पातळी समजून बोलावं.. असा सबुरीचा सल्ला त्यांनी नाव न घेता प्रा. नरेंद्र खेडेकरांना दिला. याप्रसंगी भगवानराव मुंडे यांनी कैलासच्या दोन मुलीचा विवाह सोहळ्याचा खर्च करण्याचा शब्द दिला तर कैलासच्या मुलाला माझ्या संस्थेत नोकरी देण्याचा मी शब्द याठिकाणी देतो.. असे आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतातून आ.मनोज कायंदे यांनी सांगून शिवनी आरमाळ धरणासाठी २ कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकर या धरणाचे नामकरणही आनंदस्वामी करणार असल्याचे ते म्हणाले. खडकपूर्णाचे पाणी कालव्याद्वारे या परिसरात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ.कायंदे म्हणाले. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनीसुद्धा मनोगत व्यक्त करून कैलासला श्रद्धांजली वाहिली.

आ.सिध्दार्थ खरात यांनी दिली सांत्वनपर भेट..

_कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची आ. सिद्धार्थ खरात यांनी भेट घेऊन राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरीच शेती आहुती मागतेय असे पत्र लिहून जीवन संपवत असेल तर राज्यात सर्वसामान्य शेतकर्‍यांची काय अवस्था आहे, हे शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येवरुन अधोरेखित होते.

अशा शोकसंवेदना व्यक्त करून कैलास नागरे यांची ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने त्यांचा घेतलेला बळी असल्याचा आरोप करत अजून किती कैलासांना सरकार कैलासवासी करणार आहे ? असा संतप्त सवाल केला.तर या कुटुंबाला सरकारने तातडीने मदत करण्याची मागणीही आ.सिध्दार्थ खरात यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये