पालकमंत्र्यांनी घेतला सेवाग्राम विकास आराखड्याचा आढावा
आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण व सहकार तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी केल्या. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक हरविर सिंग, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, महाऊर्जाचे (मेडा) जिल्हा व्यवस्थापक रितेश तायवाडे, मुख्याधिकारी राजेश भगत व ईपीकॉनचे वसीम खान उपस्थित होते.
सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत पहिला टप्पा 145 कोटी, दुसरा टप्पा 17.51 कोटी व तिसरा टप्पा 81.57 कोटी अशा 244.08 कोटी किमतीच्या आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली प्रदान केली आहे. यात 139 कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 95 कामे पूर्ण झाली आहेत. यात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी, एक अनुभूती’ या विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे. तीनही टप्प्यातील कामांचा आढावा पालकमंत्री डॉ. भोयर यांनी घेतला.
सेवाग्राम विकास आराखड्यात पर्यावरणीय विकास अंतर्गत इको फॉरेस्ट उद्यानाच्या कामाबाबत पालकमंत्री यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. पवनार ग्रामपंचायत भवन बांधकाम तातडीने पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले.
कोषागार कार्यलयासमोरील जागेत असलेल्या हॉकर्स प्लाझाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे असे ते म्हणाले. आराखड्यातील प्रस्तावित असलेली कामे सोलरवर प्रस्तावित करावी, जेणेकरून वीज बचत होऊन विद्युत देयक शुन्य होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करतांनाच ती गुणवत्तापूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार यांनी आराखडा विकास कमांचे सादरीकरण केले. यावेळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी, एक अनुभूती’ अंतर्गत मंजूर कामाचा व कार्यान्वित यंत्रणाचाही आढावा घेण्यात आला