चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरीकांना तातडीने आर्थिक मदत करा.
औचित्याचा मुद्दा उपस्थीत करून आमदार सुभाष धोटेंची राज्य सरकारकडे मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
चंद्रपूर जिल्ह्यात २१ ते २४ जुलै दरम्यान झालेली अतिवृष्टी व पुरामुळे १२ हजार ८४१ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून पुढे आले असून अंतिम अहवालात नुकसानीचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत २२ हजार ८३५ शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. खरीपाचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणीयोग्य पाऊस आल्याने खरीपाच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांनी धान, तुर, कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्याची पेरणी केली, पीके जोमाने वाढीस लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरम्यान, २१ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने झोडपणे सुरू केल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून २१ ते २४ जुलै या कालावधीतील अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा, वैनगंगा व इरई नदीला पूर आल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झालेले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पॉम्भूर्णा सावली, ब्रम्हपूरी, सिंदेवाही या तालुक्यात खरीप पिकाची सर्वाधिक हानी झाल्याने अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत मिळणे आवश्यक आहे. पाऊस व अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३८९ गावे बाधित झाली असून रस्त्यांचे, घरांचे आणि नागरिकांचे मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आर्थीक परिस्थितीमूळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच चंद्रपूर जिल्हयात दिनांक २६ जुलै रोजी शेतात कामे करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला असुन १२ ते १५ शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष घालून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचे निर्देश शासनामार्फत तातडीने दिले जावेत, यासाठी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तसेच या संदर्भात आ. धोटे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना देखील निवेदन देऊन राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील शेतपिकांचे सरसकट सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.