बीजेएसचे समाजासाठी समर्पण भावनेने काम : देवेंद्र फडणवीस
(बी जे एस च्यादोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात समाजाच्या प्रगतीसाठी घेण्यात आले महत्त्व पूर्ण निर्णय)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारताच्या जिडीपीमध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे. भारताच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा रस्ता जैन समाजातून जातो. भगवान महावीर स्वामी आणि सर्व तीर्थंकर यांनी दिलेल्या तत्त्वात घेण्यापेक्षा देण्याची भावना आहे. यातूनच जैन समाज हा घेणारा नाहीतर देणारा समाज म्हणून ओळखला जातो. या दृष्टीकोनातून भारतीय जैन संघटना समर्पण भावनेने काम करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात दुसऱ्या सत्रात जलसंधारण या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यात आमीर खान आणि शांतिलाल मुथ्था आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीजेएसने जमीनीवर उतरून काम केलं आहे. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि बीजेएसने जलसंधारणाचे केलेलं काम लोकांना एकत्र करून जागवण्याचे काम केले आहे. हे समाज परिवर्तन बीजेएस आणि पाणी फाऊंडेशनने केलेले परिवर्तन आहे. यामुळे नक्कीच गावे सुजलाम सुफलाम होतील, हजारो गाव पाण्याने परीपूर्ण होतील. बीजेएसचे हे काम निश्चितच दिशादर्शक आहे.”
“मूल्य शिक्षणाचा पुस्तके तयार करून शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा प्रयोग सर्व महाराष्ट्रातील सरकारी शाळेत शांतिलाल मुथ्था यांनी यशस्वी केला आहे. बीजे एसचे हे मॉडेल देशभर राबविण्यात येणार आहे. केव्हाही काहीही मदत लागली तर मी संपूर्णपणे बीजेएसच्या पाठीशी नेहमीप्रमाणे उभा आहे,” असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अभिनेते आमिर खान म्हणाले, “सत्यमेव जयते या कार्यक्रमातून अनेक सामाजिक समस्या पुढे येत होत्या. त्यातून एखाद्या समस्येवर ठोस काहीतरी उपाय करता येईल या उद्देशाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात केली. महाराष्ट्रात तेव्हा गंभीर पाणी समस्या निर्माण झाली होती आणि मी मुंबई, महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्रात या स्पर्धेला सुरुवात केली.”
“खरंतर समाजाकडे संवेदनशीलकडे बघण्याची दृष्टी मला माझ्या आम्मीकडून मिळाली. त्यादृष्टीने काम करीत आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने आम्ही निघालो होतो, त्यापुढे पाऊल टाकून बीजेएस आणि पाणी फाऊंडेशन मिळून येत्या काळात महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने पूर्ण करणार” असेही अमीर खान यांनी सांगितले.
“पुढील पाच वर्षांत आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनसोबत जलसंधारणाचे काम करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी बीजेएस पूर्ण ताकदीने काम करणार आहे, असा विश्वास बीजेएसचे संस्थापक मुथ्था यांनी व्यक्त केला.