शेतकऱ्याच्या तक्रारीवरून निखार राईस मिलवर कारवाईचा बडगा
वैध मापण शास्त्र विभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील एका शेतकऱ्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे धानाचा उतारा कमी मिळाला तसेच वजन काटा केल्या जात नाही. या संबंधीची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने वैध मापण शास्त्र विभागाकडून कारवाई करण्यात आली.
भद्रावती चे शेतकरी अनिल भोंग यांनी ३५ पोते धान तांदुळ काढण्यासाठी निखार राईस मिल, चंदनखेडा येथे नेले. त्यावर त्यांना फक्त १२ क्विंटल तांदूळ मिळाले. धानाचा उतारा अत्यंत कमी आल्याने त्यांनी राईस मिल मालक आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती कडे तक्रार केली. परंतु त्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला नाही. आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती कडे लिखित तक्रार दाखल केली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती ने सदर तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सदस्य, प्रवीण चीमूरकर यांचेकडे दिली. प्रवीण चीमूरकर यांनी सदर तक्रार तहसीलदार भद्रावती आणि अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य, प्रवीण चीमूरकर यांनी दि.३१ जानेवारीला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत हा विषय उचलुन धरला आणि पुरवठा विभागाकडून लगेच कारवाई करण्याचे पत्र काढण्यात आले.
वैध मापण शास्त्र विभागाचे निरिक्षक सुनील वाडे यांनी दि. १४ फेब्रुवारी ला निखार राईस मिल, चंदनखेडा येथे भेट देऊन तपासणी केली असता वजन काटा पडताळणी प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर वाडे यांनी निखार राईस मिल वर कारवाई केली.
माझे जवळपास ५ ते ६ क्विंटल चे नुकसान झाले असुन मला नुकसान भरपाई मिळाली पाहीजे. असे पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत होऊ नये यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
अनिल भोंग, शेतकरी, भद्रावती.
शेतकऱ्यानी आता ग्राहक अधिकार जाणुन घेण्याची गरज आहे. ग्राहक संरक्षण कायदा असुन सुद्धा ग्राहकांची फसवणूक होते ही चिंतेची बाब आहे. शेतकरी बांधवानी आता यावर आवाज उठवला पाहीजे. कोठेही आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आवाज उठवा आणि तक्रार दाखल करा. आपल्याला न्याय नक्की मिळेल. ग्राहक संरक्षण कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
प्रवीण रामचंद्र चीमूरकर,सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर