प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नसतानांसुद्धा ‘त्या’ इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमि.चे कोळसा उत्खनन सुरू
सहा गावातील नागरिकांनी एकत्र येत केला विरोध
चांदा ब्लास्ट
स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नसताना आणि भूसंपादनाचा निर्णय झालेला नसताना भद्रावती येथे अरविंदो रियॅल्टी इंन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने खाणीतून कोळसा उत्खननासाठी पाणी काढणे सुरू केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढून कोळसा काढण्यास तीव्र विरोध केला आहे.
भद्रावती तालुक्यातील टाकळी-जेना-बेल्लोरा उत्तर आणि दक्षिण कोळसा खाणीचा पट्टा अरविंदोला मिळाला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांशी कोणतीही चर्चा न करता अरविंदोने २२ लाख रुपये एकरी देण्याची घोषणा केली. तसेच माध्यमांमध्ये प्रकल्पग्रस्तांशी ऐतिहासीक करार केल्याच्या बातम्या प्रकाशित करून जिल्हा प्रशासनासह गावकऱ्यांची दिशाभूल केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने सारवासारव करण्यास सुरुवात केली. या खाणीमुळे बाधित होणाऱ्या सहा गावातील नागरिकांनी एकत्र येत विरोध केला. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर अरविंदो आणि गावकऱ्यांच्या बैठका झाल्या. मात्र, भूसंपादन आणि नोकरीचा प्रश्न सुटू शकला नाही.
त्यापूर्वीच या खाणीच्या मध्यभागी अस्तित्वात असलेल्या जुन्या डागा कोळसा खाणीतून पाणी बाहेर काढणे प्रारंभ केले. त्यामुळे या क्षेत्रातील गावात नाल्याना पूर आला आहे. या अरबिंदो निर्मित पुरामुळे शेतमाल काढणे अवघड झाले असून शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर वारंवार विचारणा करूनही कंपनी मौन पाडून आहे.