ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतमाल उत्पादनात वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा – विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार 

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आढावा - खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना निर्देश 

चांदा ब्लास्ट

आगामी शेतीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणे बियाणे, खते तसेच शेतमाल उत्पादन वाढीकरिता लागणारे मार्गदर्शन अगदी सहजपणे उपलब्ध करून देऊन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता व शेतमाल उत्पादनात वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा विधिमंडळ पक्षनेते व लोक लेखा समिती अध्यक्ष, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत अध्यक्ष बोलत होते.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली, ब्रह्मपुरी तालुक्याच्या कृषी विभागाची आज सिंदेवाही येथील पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक पार पडली. आयोजित बैठकीस कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन पवार, नायब तहसीलदार तुमराम, सहाय्यक गटविकास अधिकारी तितरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, कृउबा समिती उपसभापती दादाजी चौके, माजी प. स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, चंद्रकांत शिंदे, सचिन नाडमवार तसेच तालुका काँग्रेस पदाधिकारी कृषी विभागाचे सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

तत्पूर्वी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्व नियोजनाबाबत आढावा बैठकीत माहिती दिली. यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, या विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी या नात्याने तीनही तालुक्यामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेती व्यवसायात प्रगती करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

अशातच आता कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतमाल उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, माती परीक्षण, कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर, नैसर्गिक शेतीवर अधिकाधिक भर, तसेच कृषी केंद्रांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवून जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील असावे. सोबतच मागणीनुसार मुबलक प्रमाणे बियाणे, खते व कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासून अधिकाधिक प्रयत्न करावे. असे निर्देश यावेळी उपस्थित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. तर आगामी काळात येणाऱ्या खरीप हंगामात थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आधुनिक शेती पद्धतीने शेती व्यवसायात प्रगती करणे हेतू उचित मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनात वाढीकरिता अधिकाधिक प्रयत्न करावे. आणि नुकताच आपल्या क्षेत्रात अवकाळी पावसाची हजेरी व गारपीट यामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई करिता सरकारकडे मागणी करावी.

असेही निर्देश यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा लोक लेखा समिती अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. आयोजित बैठकीस कृषी विभागाचे सर्व अधिकारी काँग्रेस पदाधिकारी तथा बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये