उलगुलान कामगार संघटनेच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश, वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या खात्यात पगार व पीएफ झाले जमा
कामगारांवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरू, राजु झोडे यांचा इशारा

चांदा ब्लास्ट
मागील आठ दिवसांपासून मेजर गेट समोर सुरू असलेल्या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून कामगारांच्या खात्यात पगार व कामगारांच्या पीएफचा भरणा झाल्यानं अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्यासह वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी आंदोलनाला बसलेल्या कामगारांनी जल्लोष देखील साजरा केला.दरम्यान कामगारांवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा झोडे यांनी दिला आहे.
कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते.याविरोधात मेजर गेट समोर हे साखळी उपोषण सुरू होते.मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने सोमवार पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. अशातच गुरुवारी रात्री उशिरा वीज केंद्रातील अधिकारी व कुणाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व चर्चा केली.
यावेळी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत कामगारांच्या खात्यात त्यांचा थकीत पगार, त्यांचा पीएफचा भरणा केला.तसेच लेखी लिहुन दिल्याने हे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, रवि पवार, श्याम झिलपे, मंगेश बदकल, कुणाल चौधरी,सुमित भिमटे, संपत कोरडे,अक्षय काकडे, पंढरी टोंगे, आंनद पुणेकर, राहुल तुराणकर,अभय सपाट, आशीष ठेगणे, गुरु भगत,रविन्द्र मोटगरे,पंचशील तामगाडगे, सुरज रामटेके यांच्यासह उलगुलान कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.