लोकशाहीच्या बळकटीकरिता मोदी -शहांचा पराभव आवश्यक- डॉ. विश्वंभर चौधरी
बहुजन विकास मंच द्वारा आयोजित कार्यक्रमाचा समारोप.
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या पटांगणात दिनांक 22 ते 24 फेब्रुवारी पर्यंत बहुजन विकास मंच चंद्रपूर द्वारा बहुजन समाजातील नागरिकांकरिता विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले लिखित तृतीय रत्न या नाटकाचे सादरीकरण 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तसेच शिवराय ते भिमराय असा प्रवास सांगणारा मी वादळवारा हा कार्यक्रम अनिरुद्ध वनकर यांच्यातर्फे सादर करण्यात आला.
24 फेब्रुवारी रोजी निर्भय बनो या शीर्षकाखाली डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी म्हणाले की, 2014 पासून देश हुकूमशाही कडे चाललेला दिसून येत आहे, लोकशाही जर बळकट करायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीत मोदी व शहांचा पराभव होणे आवश्यक आहे. आज भारतीय जनता पार्टी घाबरली असून त्यांना विरोधी पक्षातील नेत्यांची गरज भासत आहे. देशातल्या अनेक स्वायत्त संस्था हाताशी घेऊन विरोधी पक्षांतील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव केंद्रातील सरकार करीत आहे. समाजा समाजात द्वेष निर्माण करून हे सरकार सामाजिक असंतोष निर्माण करीत आहे. देशातील अनेक संस्था अदानी व अंबानीला विकून त्यांना आर्थिक बळकट करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे देशात आर्थिक असमतोल निर्माण होत आहे. एकीकडे देश बळकट होत चालल्याचे सांगून दुसरीकडे ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य देत असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहे हा विरोधाभास असून आज याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, आज या देशात संविधान टिकवायचे असेल तर हे हुकूमशाहीचे सरकार घालून बहुजनांचे नवीन सरकार आणण्याची गरज निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षातील विविध माजी नगरसेवक व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला.यावेळी मंचावर आमदार सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोपाल अमृतकर अँड. प्रीतीशा साधना, तसेच बहुजन विकास मंचातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.