ताज्या घडामोडी

मनपाच्या पाणी पुरवठा योजनेचे खाजगीकरण तत्काळ थांबवा – माजी नगरसेवकांचा प्रशासनाला इशारा

निविदा मागे घेण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

राज्यातील स्थानिक प्रशासन संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्याने चंद्रपूर मनपाचा कारभार प्रशासनाच्या हातात असुन प्रशासन मनमानी कारभार करून जनतेच्या पैशाची लूट करत आहे तसेच मनपाच्या विविध योजनेचे खासगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप चंद्रपूर मनपाच्या माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत मनपाने

चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच ह्या योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी खाजगी कंत्राटदार नेमण्याच्या उद्देशाने ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केली. ह्या निविदेच्या माध्यमातून मनपा प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला असल्याचे दहा माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने 48 तासांच्या आत ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी केली असुन प्रक्रिया रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर शहराला इरई धरण, तुकुम जलशुद्धीकरण केंद्र, इरई नदी, दाताळा हेडवर्क्स, रामनगर जलशुद्धीकरण, रामनगर जुने जलशुद्धीकरण केंद्र, बाबूपेठ सम्पवेल, बाबुपेठ जुने सम्पवेल येथुन पाणीपुरवठा केल्या जातो. ह्या सर्व ठिकाणचे सर्व पंप, पॅनल, मोटार, व्हॉल्व इत्यादी पाणीपुरवठा योजनेतील सर्व यंत्रसामुग्री किंवा यंत्रसामुग्री- उपकरणे चालविण्यासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली. यापूर्वी पाणीपुरवठा योजनेतील ही सर्व कामे करण्यासाठी उज्वल कन्स्ट्रक्शन या एजन्सीला काम देण्यात आले होते. पाणीपुरवठा योजनेमध्ये उज्वल कन्स्ट्रक्शनच्या भोंगळ कारभारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा तसेच मनपाला सुद्धा आर्थिक तोटा झाला.यानंतर मनपाच्या आमसभेत सर्वानुमते पाणीपुरवठ्याचे कंत्राट रद्द करून मनपातर्फे पाणीपुरवठा योजना चालविण्याचा ठराव घेण्यात आला. ही यंत्रणा चालविण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. मागील दोन वर्षापासून मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा योजना चालविण्यात येत आहे.मात्र आता अचानक या संपूर्ण योजनेसाठी एकाच कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या हेतूने मनपा प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली. यापूर्वी चंद्रपूर शहरातील सुमारे चार लक्ष नागरिकांच्या वतीने मनपाच्या आम तत्कालीन नगरसेवकांनी सर्वानी मते खाजगीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मनपाची नवीन महासभा अस्तित्वात येईपर्यंत जुन्या आम सभेने घेतलेल्या निर्णयाचा मनपा प्रशासनाने आदर राखणे आवश्यक असल्यामुळे माजी नगरसेवक प्रस्तावित खाजगीकरणाचा विरोध करीत असल्याची माहिती माजी नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, दिपक जयस्वाल, अशोक नागापुरे, पुष्पा मुन, मंगला आखरे, नीलम आक्केवार, स्नेहल रामटेके, बंटी परचाके, आकाश साखरकर, राजू आखरे तसेच जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे, मनीषा बोबडे इमदाद शेख, अक्षय येरगुडे, प्रफुल बैरम उपस्थित होते.

सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी खाजगीकरणाचा विरोध करण्याचे आवाहन

विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहोचविण्याच्या हेतूने पुन्हा एकदा आडमार्गाने खाजगीकरण करण्याचा मनपा प्रशासनाचा डाव आहे. मनपा प्रशासनाच्या या मनमानीचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे विरोध करावा असे आवाहन माजी नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्ह्यातील विविध पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे सुद्धा आवाहन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये