ताज्या घडामोडी
मोबाईलमधे गुंग असलेल्या तीन टी सी ला फलाटावर सोडुन ट्रेन रवाना – केरळ एक्सप्रेस धावली टी सी विना
गार्ड ने आपातकालीन ब्रेक करून गाडी थांबविली मात्र टी सी फलाटावर थांबले - बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील घटना
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच, राजुरा
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आज अनोखी घटना उघडकीस आली असुन केरळ एक्सप्रेस चक्क टी सी विना बल्लारशाह येथुन नागपुर कडे रवाना झाली त्यावेळी त्या गाडीवर कर्तव्यावर असलेले तीन टी सी मात्र फलाटावरच बसुन होते हे विशेष.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 16 मार्च रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 6:20 मिनिटांनी सुटणारी 12625 क्रमांकाची केरळ एक्स्प्रेस फलाट क्र. 4 वर उभी होती. ही ट्रेन वेळेपुर्वी बल्लारशाह स्थानकावर पोहोचल्यामुळे जवळपास 1 तास फलाटावर होती.
ह्या ट्रेन मधे कर्तव्यावर असलेले 3 टीसी देखिल फलाटावर असलेल्या बाकड्यावर बसुन होते. मात्र हे टीसी मोबाईल मधे इतके गुंग होते की, केरळ एक्सप्रेस सुटण्यासाठी स्टेशन वर सुरू असलेल्या उद्घोषणांकडेही तिघांचेही मुळीच लक्ष नव्हते. अखेरीस ही गाडी आपल्या नियोजित वेळी म्हणजेच सायंकाळी 6:20 वाजता सुटली तरीही तीनही टीसी मोबाईल मधे गुंग असल्याने फलाटावर राहिले.
अखेरीस जेव्हा केरळ एक्सप्रेस सुटल्याचे त्यांच्या लक्षात आले तोपर्यंत गाडीने वेग घेतला असल्याने धावत्या गाडीत चढणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांनी गार्ड ला इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीची गती वाढली असल्याने गार्ड ने आपातकालीन ब्रेकचा वापर करून गाडी थांबविली मात्र ह्यादरम्यान गाडी फलाटावरून समोर निघाली असल्याने त्या तीनही टीसींनी गाडीत न जाणे पसंत केले व मागाहून जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस ने ते नागपुर कडे रवाना झाले.
ह्या सर्व प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या तीनही टीसिंचा बेजबाबदारपणा दिसत असुन फलाटावरून ट्रेन निघुन जात पर्यंत ते मोबाईल मधे गुंग होते म्हणजेच त्यांना आपल्या कर्तव्याशी देणेघेणे नाही असे लक्षात येते. महत्वाचे म्हणजे त्या गाडीतल्या कुणाचेही तिकीट नागपुर पर्यंत तपासण्यात येणार नहीं म्हणजेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्याहुन महत्वाचे म्हणजे प्रवासादरम्यान प्रवाशांबाबत काही अप्रिय घटना किंवा तातडीची गरज पडल्यास टीसी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारण्यात येऊ शकत नाही.
यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने टीसी कक्षात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कर्तव्यात कसुर करणारे ते टीसी बल्लारशाह येथिल नसल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांच्या ड्युटी चार्ट मधे त्या टीसिंची नावे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याने कर्तव्यात कसूर करणारे ते तीन महाभाग कोण ह्याची रेल्वे प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.