नियमित अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य आधारित शिक्षण गरजेचे – कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराला भेट आणि संवाद
चांदा ब्लास्ट
शिक्षणातून नोकरी सोबतच उद्योजकता वाढीस लागणे हे खरे यश आहे.बदलत्या काळात पारंपारिक शिक्षणासोबतच कौशल्यावर आधारित शिक्षणही गरजेचे आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे मत एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले. बल्लारपूर येथील विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल येथे आयोजित “संवाद” कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी नव्यानेच सुरू झालेल्या बल्लारपूर येथील आवाराला नुकतीच भेट दिली. महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी कुलगुरू यांचे बल्लारपूर आवारात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कुलगुरू यांच्या स्वागतासाठी आवारातील विद्यार्थीनींनी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख सांगणारी वनसंपदा आणि वाघ यांचे चित्र रांगोळीद्वारे साकारले होते.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेला वंदन करून ‘संवाद’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. संवाद कार्यक्रमाच्या मंचावर कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश इंगोले यांनी केले. यावेळी त्यांनी बल्लारपूर आवारातील वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली. कुलगुरू यांनी बल्लारपूर आवारात नव्याने प्रवेशीत झालेल्या विद्यार्थीनींशी ‘संवाद’ साधून त्यांचे मनोगत जानून घेतले सोबतच विविध विषयांवर चर्चा केली.
संवाद कार्यक्रमात बोलतांना त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० चे महत्व सांगितले. बल्लारपूर कॅम्पस खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित वाटचाल करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त करीत याठिकाणी क्लासरूम शिक्षणासोबतच फिल्ड वरील शिक्षणाला महत्त्व द्या, विद्यार्थिनींना इंडस्ट्रीज मध्ये नेऊन प्रत्यक्ष शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या अश्या सूचना त्यांनी येथे दिल्या.
यावेळी बीसीए मधील पुनम यादव हिने कुलगुरू यांच्या छायाचित्रांचे रेखांकन करून भेट म्हणून दिले.
संवाद कार्यक्रमाचे संचालन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. खुशबू जोसेफ यांनी मानले.